सुट्टीचा पगार कापल्यास जिल्हा कामगार अधिकाऱ्यांकडे करा तक्रार
मुंबई : विधानसभा निवडणूकीसाठी सोमवार, 21 ऑक्टोबर रोजी मतदान होत आहे. मतदानप्रक्रियेत जास्तीत जास्त मतदारांना मतदान करता यावे, यासाठी खासगी कार्यालये, आस्थापना, दुकाने, कारखाने व अन्य ठिकाणी काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी तसेच कामगारांना सोमवारी भरपगारी सुट्टी किंवा सवलत मिळणार आहे. मात्र, सुट्टी दिल्यानंतर पगार कापल्यास मतदारांना जिल्हा कामगार अधिकाऱ्यांकडे तक्रार करता येणार आहे. राज्याच्या कामगार आयुक्तांनी तसे निर्देश देणारे परिपत्रक काढले आहे.
सर्व दुकाने, खासगी कार्यालये, आस्थापना, माहिती तंत्रज्ञान कंपन्या, कारखाने, मॉल्स, व्यापारी संकुल, निवासी हॉटेल, नाट्यगृहे आदी ठिकाणी काम करणारे मतदानादिवशी भरपगारी सुट्टी किंवा सवलतीस पात्र असतील. मतदारसंघातील मतदार असलेले अधिकारी, कर्मचारी कामानिमित्त मतदारसंघाबाहेर कार्यरत असल्यास त्यांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी मिळणार आहे. त्यासंदर्भात शासनाने 25 सप्टेंबर रोजी परिपत्रक काढले आहे.
अपवादात्मक परिस्थितीत पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसल्यास संबंधित जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने मतदान क्षेत्रातील कामगारांना सुट्टीऐवजी दोन ते तीन तासांची भरपगारी सवलत देणे आवश्यक राहील. अशी सवलत मिळत नसल्यास तसेच मतदानासाठी सुट्टी दिल्यानंतर त्या दिवशीचे वेतन कपात केल्यास मतदारांना जिल्हा कामगार अधिकाऱ्यांकडे तक्रार नोंदविता येणार आहे.
प्रमुख सुविधाकार, बृहन्मुंबई महानगरपालिका व त्यांच्या अधिपत्याखालील महानगरपालिकेतील प्रभागनिहाय कार्यालयामध्ये तक्रार नोंदविता येईल. तसेच राज्याचे कामगार आयुक्त यांचे कार्यालय, कामगार भवन, सी-20, ई-ब्लॉक, वांद्रे- कुर्ला संकुल, वांद्रे , मुंबई येथे तक्रार नोंदविता येईल, असे कामगार आयुक्तांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.