मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत आज पद्मश्री लक्ष्मण माने यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. मुंबई येथील प्रदेश कार्यालयात संपन्न झालेल्या या कार्यक्रमात पक्षाचे ज्येष्ठ नेते राजेश टोपे, आ. बाळासाहेब पाटील, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, युवक कार्याध्यक्ष सुरज चव्हाण उपस्थित होते.
यावेळी बोलताना जयंत पाटील म्हणाले की, ” लक्ष्मण माने यांनी खासदार शरद पवार यांची भेट घेऊन पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली. आज प्रदेशाध्यक्ष म्हणून मी त्यांचे पक्षात स्वागत करत आहे. गेली अनेक वर्षे माने राज्यातील भटक्या विमुक्त आणि वंचित घटकांसाठी काम करत आले आहेत. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत गेली 30 ते 40 वर्षे वाड्या-वस्त्यांवर जाऊन वंचित घटकांना एकत्र करत आहेत. त्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी संघर्ष करत आहेत. शरद पवार यांनी आजवर समाजातील उपेक्षित वर्गासाठीच अधिक निर्णय घेतले आहेत. समाजात अजूनही असा मोठा वर्ग आहे की ज्यांना न्याय मिळालेला नाही. आता त्यांना न्याय मिळवून देण्याचे काम आपल्याला करायचे आहे.
यावेळी प्रास्ताविक करताना पद्मश्री लक्ष्मण माने यांनी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात येत असल्याचा आनंद होत असल्याचे सांगितले. शरद पवार यांनी भटके-विमुक्त घटकांना नेहमीच न्याय देण्याची भूमिका घेतली आहे, असेही त्यांनी सांगितले. या वर्षात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा आहे. तसेच छत्रपती शाहू महाराजांचे हे जन्म शताब्दी वर्ष आहे. या वर्षाचे निमित्त साधून 31 ऑगस्ट रोजी विमुक्त दिन साजरा करण्याचा संकल्प त्यांनी जाहीर केला. शरद पवार यांच्या उपस्थितीत मोठा मेळावा घेऊन विमुक्त दिन साजरा करा, असे ते म्हणाले.
आ. राजेश टोपे यांनी पुन्हा स्वगृही आल्याबद्दल माने यांचे आभार व्यक्त केले. तर आ. बाळासाहेब पाटील म्हणाले की, “माने यांनी राज्यातील भटक्या समाजासाठी खूप चांगले काम केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा समाजातील शेवटच्या घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न करत आला आहे. माने यांच्यामुळे हे काम आणखी सोपे होईल.”
यावेळी विलास माने, नारायण जावलीकर, शारदाताई खोमणे यांच्यासह एकूण 18 जणांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे घड्याळ हाती बांधले.