मुंबई – मध्य प्रदेशमधील धार जिल्ह्यात महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बस नर्मदा नदीत बुडून वाहक आणि चालक यांच्यासह 13 प्रवाशांचा मृत्यू झाला. दरम्यान, मृतांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चव्हाण यांनी शोक व्यक्त केला आहे. तसेच, केंद्र सरकारकडून प्रत्येकी 2 लाख तर, मध्य प्रदेश सरकारकडून 4 लाख रुपये मदत जाहीर करण्यात आली आहे. तसेच, केंद्र सरकारकडून अपघातात जखमी झालेल्यांना 50 हजार रुपये मदतही जाहीर केली आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही घटनेवर तिव्र दु:ख व्यक्त केले आहे. तसेच, अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 10 लाख रुपये मदत देण्याची कार्यवाही लगेच करावी, असेही निर्देश त्यांनी एसटी महामंडळाला दिले आहेत.
बचाव कार्य व्यवस्थित पार पाडावे व जखमींवर लगेच उपचारासाठी मध्य प्रदेशमधील जिल्हा प्रशासनाशी योग्य समन्वय ठेवावा, असे निर्देश जळगाव जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. मुख्यमंत्र्यांनी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चव्हाण यांच्याशीदेखील बोलून मध्य प्रदेशमधील खरगोन व धार जिल्हा प्रशासनाला अपघातग्रस्त व्यक्तींना आवश्यक ते सहकार्य करण्याचे नियोजन करण्याची विनंती केली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या दुर्घटनेसंदर्भात मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव तसेच एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनादेखील सूचना केल्या असून बचावलेल्या प्रवाशांना तातडीने आवश्यक ती मदत करण्याचे निर्देश दिले आहेत.
धार जिल्हाधिकारी आणि एसटी प्रशासनाशी संपर्कात : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
बचाव कार्य आणि जखमींना उपचारासाठी राज्य सरकार आणि एसटी महामंडळाचे अधिकारी मध्य प्रदेश प्रशासनाशी समन्वय ठेवून आहेत, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. धार जिल्हाधिकारी आणि एसटी प्रशासनाशी संपर्कात असून शोध आणि बचावकार्य वेगाने केले जात आहे, असेही त्यांनी सांगितले.