जळगाव – मध्यप्रदेशातील धार जिल्ह्यात बस नर्मदा नदीत कोसळून मोठा अपघात झाला आहे. या अपघातात 13 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. अपघातातील मृतांची ओळख पटली असून मृतांमध्ये अमळनेर तालुक्यातील पती– पत्नीसह चालक व वाहकाचा समावेश आहे.
जळगाव विभागातील अमळनेर डेपोची ही बस होती. सकाळी साडेसात वाजता अमळनेर ते इंदूर ही बस इंदूर येथून परतीच्या मार्गाला लागली असताना खरगोन आणि धार या दोन जिल्ह्यांच्या सीमेवर असणार्या खलघाट गावाजवळ नर्मदा नदीच्या पात्रात बस कोसळली. बसमध्ये 40 प्रवासी असल्याची माहिती समोर आली आहे. यातील 13 प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
बसमधील मृत प्रवाशांची नावे –
बस वाहक प्रकाश श्रवण चौधरी (वय 40, रा. शारदा कॉलनी अमळनेर), चालक– चंद्रकांत पिता एकनाथ पाटील (वय 45, अमळनेर), चेतन राम गोपाल (जांगिड़, नांगल कला गोविंदगढ़ जयपुर राजस्थान), जगन्नाथ हेमराज जोशी (वय 70, रा. मल्हारगढ़ उदयपुर राजस्थान), निंबाजी आनंदा पाटील (वय 60, पिळोदा अमळनेर), कमलाबाई नीबाजी पाटिल (वय 55, पिळोदा अमळनेर) या मृतांची ओळख आधारकार्डमुळे पटली आहे. तसेच अरवा मुर्तजा बोरा (वय 27, रा. मूर्तिजापुर, अकोला), सैफुद्दीन अब्बास निवासी (नूरानीनगर, इंदौर) यांची ओळख नातेवाईकांमुळे पटली आहे. दरम्यान इतर मृतांची ओळख पटविण्याचे काम सुरु आहे.
दरम्यान, अपघातातील मृतांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांसह मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज चौहान यांनी शोक व्यक्त केला आहे. केंद्र सरकारकडून मृतांच्या कुटुंबियांना दोन लाख तर मध्य प्रदेश सरकारकडून चार लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.