सासवड (प्रतिनिधी) – नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर डोंगर रांगेतील दुर्ग भंडार, ब्रह्मगिरी, मेटघर किल्ला,नवरा नवरी किल्ला, अंजनेरी, रांजणगिरी, घारगड उर्फ गडगडा किल्ल्यांंची भ्रमंती टीम पॉईंट ब्रेक एडवेंचर नाशिक आणि सह्याद्रीचे वाटाडे ग्रुप सासवडच्या वतीने दोन दिवसांमध्ये सात किल्ल्यांची अनोखी भटकंती तसेच अभ्यासपूर्ण मोहीम करण्यात आली, अशी माहिती सह्याद्रीचे वाटाडे ग्रुपचे अध्यक्ष नितीन जाधव यांनी दिली.
त्र्यंबकेश्वर रांगेत अंजनेरी, ब्रह्मगिरी, दूर्ग भंडार, मेट घरचा किल्ला, घारगड उर्फ गडगडा किल्ला अपरिचित गड नवरा नवरी असे किल्ले येतात. त्यातील अंजनेरी किल्ला बजरंग बली प्रभू श्री हनुमान जन्मभूमी वास्तव्याने पावन झालेला आहे. श्री नवरा नवरी गड हा अपरिचित किल्ला नाशिक जिल्ह्यातील दक्षिण भागात इगतपुरी घोटी परिसराच्या डोंगर रांगेत आहे.
घारगड उर्फ गडगडा हा किल्ला सर करण्यासाठी गिर्यारोहण तंत्राचा वापर करावा लागतो. किल्ल्याचे स्थान पाहता याचा उपयोग मुख्यतो टेहाळणीसाठी केला जात असे. रांजणगिरी किल्ल्यावर चार ते पाच कोरीव पायर्या मोठे कातळामध्ये कोरीव पाण्याचे टाके याव्यतिरिक्त गडावर कोणतेच अवशेष नाही पण येथून डांग्या सुळका, घारगड चा किल्ला अंजनेरी किल्ला सुंदर दिसतात या गडाचा ही वापर टेहाळणीसाठी केला जात असे.
ब्रह्मगिरी महादेवांचे वास्तव्य लाभलेला हा सह्याद्रीच्या रांगेमधला एक विशाल डोंगर आहे. ब्रह्मगिरीच्या दक्षिणेला कळसुबाई ,अलंग, कुलंग मदन अशी सह्याद्रीतील काही शिखरे आहेत ब्रह्मगिरीला जोडून वायव्य दिशेष एक उपदुर्ग आहे त्याला दुर्ग भंडार असे म्हणतात, हा स्वतंत्र किल्ला नसून ब्रह्मगिरीचाच एक भाग आहे.
पॉईंट ब्रेक एडवेंचर नाशिकचे संस्थापक अध्यक्ष जॅकी साळुंके आणि त्यांचे सहकारी डॉ.समीर भिसे लव थोरे, गौरव केणी, डॉ. सूर्यकांत आदाते, डॉ. कमल सिंग क्षत्रिय यांच्या मार्गदर्शनाखाली सह्याद्रीच्या वाटाडे ग्रुपचे अध्यक्ष नितीन जाधव यांनी सात किल्ल्यांची भटकंती पूर्ण केली मोहिमेमध्ये 40 जणांचा सहभाग होता.