नवी दिल्ली – पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांना राज्य विधानसभेने मंजूर केलेल्या विधेयकांना मंजुरी देण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्याअनुषंगाने सर्वोच्च न्यायालयाने राज्यपालांना जी चपराक दिली आहे ती देशातील सर्वच राज्यपालांना लागू आहे असे ज्येष्ठ कॉंग्रेस नेते पी चिदंबरम यांनी म्हटले आहे.
त्यांनी म्हटले आहे की, सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल हा केवळ त्यांनाच नव्हे तर सर्व राज्यपालांना कठोरपणे फटकारणारा आहे. तामिळनाडूचे राज्यपाल आर. एन. रवी यांनी या निर्णयाची प्रत्येक ओळ वाचली पाहिजे अशी सुचनाही त्यांनी केली आहे. एक्सवरील पोस्टमध्ये चिदंबरमयांनी म्हटले आहे की, सर्वच राज्यपालांनी सर्वोच्च न्यायायाच्या या निर्णयाकडे काटेकोरपणे लक्ष दिले पाहिजे.
तामिळनाडुचे राज्यपाल आर. एन. रवी यांनी निकालाची प्रत्येक ओळ वाचावी आणि त्यांना आवश्यक वाटल्यास सक्षम वरिष्ठ वकिलाला बोलावून त्यांच्याकडून निर्णय समजाऊन घ्यावा असेही चिदंबरम यांनी म्हटले आहे. सुप्रीम कोर्टाने पंजाबचे राज्यपाल पुरोहित यांना 19 आणि 20 जून रोजी झालेल्या आदेशात विधानसभेने संमत केलेल्या विधेयकांना मंजुरी द्यावी व या प्रक्रियेत अडथळा आणू नये सुनावले आहे.