नवी दिल्ली – जम्मू काश्मीरमधील दहशतवाद आणि त्याच्या विरोधात लष्कराकडून केल्या जात असलेल्या कारवाईच्या संदर्भात या राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारूख अब्दुल्ला यांनी मोठे विधान केले आहे. ते म्हणाले की चर्चेतूनच प्रश्नावर तोडगा काढला जाउ शकतो. अन्यथा आपली अवस्थाही गाझा आणि पॅलेस्टीनसारखी होईल.
एएनआयशी बोलताना ते म्हणाले की जम्मू काश्मीरमधून दहशतवाद संपलेला नाही. उलट पूर्वीपेक्षा जास्त झाला आहे. द्वेषाची भावना इतकी वाढली आहे की हिंदु आणि मुस्लिम यांना वाटते की आपण एकमेकांचे शत्रु आहोत. पाकिस्तानात नवाज शरिफ यांचे सरकार येणार आहे. त्यांनी भारतासोबत चर्चेची तयारी दर्शवली आहे. ते जर तयार असतील तर आपण चर्चा का करू नये, असा सवाल अब्दुल्ला यांनी केला.
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी म्हणायचे मित्र बदलता येतात पण शेजारी बदलू शकत नाही. शेजाऱ्यांशी मैत्री असेल तर दोघांची प्रगती होते. जर शत्रुत्व असेल तर आपण वेगाने प्रगती करू शकणार नाही. स्वत: नरेंद्र मोदींनीही म्हटले आहे की आजच्या युगात युध्द हा पर्याय नाही. चर्चेद्वारेच प्रश्न सोडवले जाऊ शकतात. मग ती चर्चा आहे कुठे? जर आता पंतप्रधान होत असणाऱ्या शरिफ यांना चर्चा करायची इच्छा असेल तर आपण त्यांच्याशी चर्चा का करू शकत नाही असे अब्दुल्ला म्हणाले.
२१ डिसेंबरला झाला होता हल्ला
जम्मू काश्मीरच्या पुंछ जिल्ह्यात २१ डिसेंबर रोजी दहशतवादी हल्ला झाला. भारतीय लष्कराचा एक ट्रक आणि एक जीप्सीला दहशतवाद्यांनी लक्ष्य करत गोळीबार केला. त्यात लष्कराचे चार जवान शहीद झाले तर तीन जण गंभीर जखमी झाले. लष्कराने दिलेल्या प्रत्युत्तरात काही दहशतवादीही मारले गेले. लष्कराला लक्ष्य करण्याची ही महिनाभरातील दुसरी घटना होती. त्या अनुशंगाने बोलताना दहशतवाद संपला नसल्याचा आणि पाकिस्तानशी चर्चा करणे हाच उपाय असल्याचा दावा अब्दुल्ला यांनी केला आहे.