नवी दिल्ली – पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मतपेढीच्या राजकारणासाठी घुसखोरांचे रक्षण करत आहेत. त्या कृतीमुळे राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात येऊ शकते, असे टीकास्त्र केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी सोडले.
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपच्या बंगाल शाखेला सज्ज करण्याच्या उद्देशातून शहा यांनी त्या राज्याचा दौरा केला. त्यावेळी भाजप नेत्यांच्या बैठकीत बोलताना त्यांनी ममता आणि त्यांच्या तृणमूल कॉंग्रेस सरकारवर टीकेची झोड उठवली. त्यासाठी त्यांनी घुसखोरी, भ्रष्टाचार आदी मुद्द्यांचा आधार घेतला.
संसदेच्या पैशांच्या बदल्यात प्रश्न विचारल्याच्या आरोपावरून तृणमूलच्या नेत्या महुआ मोईत्रा यांची खासदारकी रद्द झाली. त्याचा संदर्भही शहांनी दिला. महुआ यांनी भेटवस्तूंच्या बदल्यात संसद पोर्टलचा पासवर्ड एका व्यावसायिकाला दिला. तसे असूनही ममतांनी त्यांचे समर्थन केले.
बंगालमधील गरिबांचे प्रश्न तृणमूलचे खासदार संसदेत उपस्थित करत नाहीत. कारण, त्यासाठी त्यांना महागड्या भेटवस्तू मिळत नाहीत, अशी टिप्पणी त्यांनी केली. बंगालमध्ये लोकसभेच्या एकूण ४२ जागा आहेत. त्यातील ३५ जागा भाजप जिंकेल,असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.