करोनामुळे थांबलेली अवयवदान चळवळ दोन महिन्यांनी सुरू
पुणे – लॉकडाऊनमध्ये अन्नधान्य, भाजीपाला पुरवठा करून शेतकरी देशातील नागरिकांना जगवत आहे, तर दुसरीकडे मृत्यूनंतरही एका शेतकऱ्याने दुसऱ्याला जीवनदान देण्यासाठी यकृताचे दान करत रुग्णाला जीवदान दिले आहे, अशी माहिती झोनल ट्रान्सप्लॅंट को-ऑर्डिनेशन कमिटीच्या (झेडटीसीसी) समन्वयक आरती गोखले यांनी दिली.
नगरजवळ एका गावात दि.11 मे रोजी झालेल्या अपघातात 49 वर्षीय शेतकरी गंभीर जखमी झाला. त्यांना रुबी हॉल क्लिनिक येथे पाठविण्यात आले. त्यांच्या मेंदूला मोठी दुखापत झाली होती. त्यामुळे ते कोमात गेले. त्यांचा जीव वाचवण्यासाठी डॉक्टरांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. मात्र, ते ब्रेनडेड झाल्यावर डॉक्टरांनी त्यांच्या मुलाला सांगितले. त्या वेळी मुलाने पित्याच्या अवयवदानाची इच्छा व्यक्त केली.
आपली प्रिय व्यक्ती दान केलेल्या अवयवाच्या रुपात जिवंत राहावी, हा विचार करणाऱ्या त्या मुलाला मनोमन सर्वांनी सलाम केला. यानंतर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली. दान केलेले यकृत नगर रस्त्यावरील सह्याद्री रुग्णालयातील रुग्णाला प्रत्यारोपित करण्यात आले. त्यासाठी अवयवदान करणाऱ्या आणि प्रत्यारोपण करणाऱ्या अशा दोघांचीही करोनाच्या संसर्गाची चाचणी करण्यात आली. विशेष म्हणजे, करोनाचा वाढत्या प्रादुर्भावामुळे मागील दोन महिन्यांपासून अवयवदानाची थांबलेली चळवळ यामुळे पुन्हा सुरू झाली आहे.