बांगलादेशचा वेगवान गोलंदाज अल अमिन हुसेनने केला आरोप
ढाका – भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली कर्णधार झाल्यानंतर खूप शांत झाला असला तरीही एखाद्या वेळी अचूक गोलंदाजीसमोर धावा काढता आल्या नाहीत तर थेट समोरच्या गोलंदाजाला शिव्या देतो. त्याच्या या वर्तनाचा मी देखील अनुभव घेतला आहे. असे सांगत बांगलादेशचा गोलंदाज अल अमिन हुसेन याने कोहलीवर आरोप केले आहेत.
कोहलीविरुद्ध खूप सामने खेळलो आहे. पूर्वी तो भर मैदानावरही अनेकदा आक्रमक झालेला पाहिला आहे. मात्र, जेव्हा त्याच्याकडे नेतृत्व आले तेव्हापासून त्याच्या स्वभावात बदल झाला असून तो आता पूर्वीसारखा चिडत नाही, पण तो फलंदाजी करत असताना समोरच्या संघातील एखाद्या गोलंदाजाच्या षटकात धावा घेता आल्या नाहीत तर मात्र, कोहली भयंकर संतापतो, व त्यामुळे निर्माण होत असलेल्या नैराश्यामुळे तो चक्क त्या गोलंदाजा शिवीगाळही करतो. इतकेच नाही तर त्याने काय अपशब्द वापरले ते तो स्वतःही जाहीररीत्या सांगू शकणार नाही, असे हुसेन म्हणाला.
बांगलादेशविरुद्ध झालेल्या अनेक सामन्यात मला कोहलीचे अनुभव आलेले आहेत. माझ्या गोलंदाजीवर त्याला जेव्हा वेगाने धावा काढता येत नव्हत्या त्यावेळी तो स्वतःवर खूप चिडला होता. मात्र, त्याचा हा राग त्याने माझ्यासह संघातील अन्य गोलंदाजांवर देखील काढला. आपला राग व्यक्त करताना त्याने ज्या शिव्या दिल्या त्याची वाच्यता देखील करता येणार नाही. ख्रिस गेल, रोहित शर्मा किंवा आजच्या काळातील अनेक क्रिकेटपटू पाहिले आहेत. समोरच्या गोलंदाजाच्या गोलंदाजीवर धावा काढता आल्या नाहीत तर ते दखील निराश होतात. मात्र, कोहली वगळता अन्य एकही खेळाडू अशा पद्धतीने शिवीगाळ करत नाही. चौकार, षटकारच नव्हे तर एकेरी धाव घेणेही शक्य झाले नाही की कोहली खुप चिडलेला दिसतो, असेही हुसेनने स्पष्ट केले.