मुंबई – पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. शिंदे-फडणवीस-पवार सरकार एकत्र आल्यानंतर राज्यातील हे पहिलेच अधिवेशन आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विविध मुद्द्यांवरून सत्ताधाऱ्यांना विरोधकांनी घेरण्याचा प्रयत्न केला. विधान परिषदेचे कामकाज सुरू होताच विरोधकांनी गोंधळ घालण्यास सुरूवात केली. यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्यावर विरोधकांकडून आक्षेप घेण्यात आला.
काही दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरे गटातून नीलम गोऱ्हे यांनी शिंदे गटात जाहीर प्रवेश केला होता. मात्र यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभापतीवर आक्षेप घेता येत नाही असे स्पष्ट सांगितले. नीलम गोऱ्हे यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली आहे, त्या म्हणाल्या की, “मी लोकशाहीवादी व्यक्ती आहे. गोंगाट करतायेत जे काही करायचे त्याआधी नियमांवर चर्चा करू. आजचे कामकाज होऊ द्या. ज्यावेळी शोक प्रस्ताव असतो त्यावेळी दुसरा कुठलाही विषय घेता येत नाही. माझ्याविरोधात अविश्वास असेल तर मी माझ्या अधिकारात तुम्हाला तसा ठराव सभागृहात मांडण्याची अनुमती देऊ शकते. परंतु गटनेत्यांच्या बैठकीत तुम्ही आला नाहीत. चर्चा केली नाही. उद्या याला वेळ देण्याबाबत चर्चा करू. आता मी काही ऐकू शकत नाही. मी चर्चेला वेळ देते पण अशाप्रकारे सभागृह चालवू शकत नाही. हे सभागृह नियमाने चालते. ”
दरम्यान, नीलम गोऱ्हे, मनिषा कायंदे, बिपल्व बजोरिया यांच्या विरोधात शिवसेना उद्धव ठाकरे गटाने अपात्रतेची नोटीस बजावली आहे. विधीमंडळ सचिव जितेद्र भोळे यांच्याकडे ही नोटीस देण्यात आली आहे. यावर अंबादास दानवे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. नीलम गोऱ्हे यांना निलंबित करण्यासंदर्भात आम्ही नोटीस पाठवली आहे. ज्या व्यक्तीवर डिस्क्वालिफिकेशन संदर्भात नोटीस असेल, त्यांना त्या पदावर राहता येत नाही, असे आंबादास दानवे यांनी म्हटले आहे.
नीलम गोऱ्हे या सभागृहात एकतर्फी काम करतात – अनिल परब
तर नीलम गोऱ्हे यांनी पक्षाचं सदस्य सोडलं आहे. आम्ही त्यांच्या विरोधात डिस्क्वालिफिकेशन दाखल केला आहे. सुप्रीम कोर्टाने काय निर्णय दिला माहिती आहे. अध्यक्षांना अधिकार दिलेत. परंतु इथे उपसभापती यांच्यावर डिस्क्वालिफिकेशन आहे. त्यामुळे त्यांनी त्या पदावर राहू नये. त्यांना नैतिक अधिकार नाही, पण ते कायदेशीर देखील नाही. नीलम गोऱ्हे या सभागृहात एकतर्फी काम करतात, असे ठाकरे गटाचे नेते अनिल परब म्हणाले.