नगर, (प्रतिनिधी) – गेल्या अनेक वर्षांपासून धनगर समाजाल एस. टी. प्रवर्गातून आरक्षण मिळावे, यासाठी समाजाने मोठा लढा उभा केला आहे. राज्यभर विविध संघटना, संस्था त्यासाठी उपोषण, आंदोलने, मोर्चे काढत आहेत.
या सर्वांचा केंद्रबिंदू हा नगर जिल्हा आहे. धनगर समाजाला आरक्षण मिळावे, ही सरकारची भुमिका राहिली आहे. कायदेशीर बाजू तपासून धनगर समाजाला आरक्षण मिळावे, या साठी आपणही येणार्या अधिवेशनात धनगर समाजाच्या आरक्षणाचा विषय लावून धरणार असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.
धनगर समाज सेवा संघाच्यावतीने शहरातील सावेडी उपनगरातील गंगा लॉन येथे आयोजित राज्यस्तरीय वधू-वर मेळाव्याच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. या वेळी संघाचे अध्यक्ष राजेंद्र तागड, व्याख्याते किसन आटोळे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष माजी नगरसेवक संपत बारस्कर, नगरसेवक निखिल वारे, संघाचे मार्गदर्शक निशांत दातीर, विठ्ठलराव वाडगे, दत्तात्रय गावडे, अशोक राशीनकर, काका शेळके, ए.वाय.नरोटे, अनिल ढवण, डॉ. अशोक भोजने, गोवर्धन सरोदे, ज्ञानदेव घोडके, प्रा. शरद धलपे, रोहन ढवण, प्रथमेश तागड आदी उपस्थित होते.