मुंबई : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न, उद्योग आणि विविध मुद्द्यांवर शिंदे-फडणवीस आणि पवार सरकारला विरोधकांनी घेरण्यास सुरुवात केली आहे. याचा प्रत्यय आजच्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आला. काँग्रेसचे नेते, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी राज्यातील बळीराजाचे प्रश्न विधानसभेत मांडले होते. त्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही त्यांच्या खास शैलीत उत्तर दिले.
विधानसभेच्या पहिल्या दिवशी काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी, “राज्यातील पावसाची परिस्थिती गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. राज्यातील ५० टक्के जास्त भागात पाऊस नसल्याने केवळ २० टक्के पेरण्या झालेल्या आहेत. शेतकरी पूर्णपणे हवालदिल झाला आहे. अतिवृष्टी आणि गारपीटीने शेतकऱ्यांचे नुकसान झालं आहे. कांद्याला ३५० रुपये अनुदान जाहीर केलं. पण, ती मदतही पोहचली नाही.” असा आरोप केला.
मान्सून उशिरा सुरू झाल्याने खरिपाच्या पिकांची आणि शेतकऱ्यांची स्थिती गांभीर्यपूर्वक झाली आहे, आतापर्यंत फक्त 20 टक्के पेरण्या झाल्या आहेत, अशी परिस्थिती महाराष्ट्राची आहे. त्यामुळे शेतकरी पूर्ण हवालदिल झालेला आहे.
मागील काही महिन्यात अतिवृष्टी, गारपिट यामुळे खूप नुकसान… pic.twitter.com/6g06ziujWv
— Balasaheb Thorat (@bb_thorat) July 17, 2023
त्यासोबतच पुढे बोलताना त्यांनी “बाजारात मोठ्या प्रमाणात बोगस बियाणे आली आहेत. काही टोळ्या सरकारी असल्याचं दाखवून हफ्ते वसुली करत आहेत. पण, दुर्दैवाने सरकारचं शेतकऱ्यांकडे कोणतेही लक्ष नाही. मंत्रिमंडळ विस्तार, खातेवाटप, दिल्ली दौऱ्यामुळे शेतकरी आणि महाराष्ट्राकडे दुर्लक्ष सरकारचं झालं आहे,” अशी टीका देखील बाळासाहेब थोरात यांनी आपल्या बोलण्यातून केली.
बाळासाहेब थोरात यांच्या या टीकेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले. त्यांनी, “काही भागात पाऊस कमी असल्याने पेरण्या होऊ शकल्या नाहीत. मागील वर्षीच्या तुलनेत ८० टक्केच पेरण्या झाल्या आहेत. पुणे आणि नाशिक विभागात पेरण्यात कमी झाल्या आहेत. हवामान विभागाने पुढील आठवड्यात पाऊस सांगितले आहे. त्यामुळे पेरण्या योग्य प्रकारे होतील.” असे आश्वासन यावेळी दिले.
त्यासोबतच “याबाबत एका समितीची स्थापना केली आहे. दुबार पेरण्याची करण्याची वेळ आली, तर सरकारने एक आखणी केली आहे. गेल्या वर्षभरात १० हजार कोटी रुपयांची मदत शेतकऱ्यांना करण्यात आली आहे. नियमीत कर्ज भरणाऱ्या साडेसोळा लाख शेतकऱ्यांपैकी फक्त ५० हजार जण बाकी आहेत. बाकी सर्वांना कर्जवाटप करण्यात आले आहे. कोणत्याही परिस्थितीत हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी उभे राहिल,” असा विश्वास देखील देवेंद्र फडणवीसांनी यावेळी व्यक्त केला.