रांजणी – शिवसेनेचे उपनेते तथा माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी पुण्यातून लोकसभेची निवडणूक न लढविता शिरूर लोकसभा मतदार संघातून खासदारकीची निवडणूक लढवावी, असा आग्रह शिवसैनिकांसह जिल्हाप्रमुख माऊली कटके यांचा देखील आहे. मात्र पुण्यातून आढळरावांनी निवडणूक लढविण्यास दस्तूरखुद्द कटके यांनी विरोध दर्शवला असून, मातोश्रीवरून विचारणा झाल्यास आढळराव यांना शिरूरमधूनच उमेदवारी द्यावी, अशी मागणी करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
2019 साली शिरूर लोकसभा निवडणूक पराभूत झाल्यानंतर आढळराव पाटील यांनी या मतदारसंघात मतदारांशी आणि सर्वसामान्य नागरिकांशी सातत्याने जनसंपर्क ठेवला आहे. त्यामुळे आढळराव पाटील शिरूरमध्ये लोकप्रिय नेते म्हणून परिचित नेते आहेत. त्यामुळे आढळराव पाटील हे शिरूर लोकसभा मतदार संघातून आगामी 2024च्या लोकसभा निवडणुकीत मोठ्या फरकाच्या मताधिक्क्याने विजयी होतील, असा विश्वास जिल्हा परिषदेचे शिवसेना गटनेते देविदास दरेकर यांनी व्यक्त केला आहे.
संजय राऊत राऊत यांनी कुणालाही विश्वासात न घेता आढळरावांनी पुणे शहरातून लोकसभा लढविण्याचा ठेवलेला प्रस्ताव अमान्य असल्याचे जुन्नर, आंबेगावचे जिल्हा प्रमुख शरद सोनवणे यांनी स्पष्ट केले. शिरूरबाबत निर्णय घेताना शिवसेनेच्या वरिष्ठांनी स्थानिक परिस्थिती विचारात घ्यायला हवी होती.
सध्याच्या घडामोडीमुळे शिवसैनिक आधीच संतप्त आहेत. त्या पार्श्वभूमीवर आढळराव पाटील यांचा कोणताही संपर्क नसलेल्या पुण्यातील उमेदवारी बाबत भाष्य करणे हे केवळ आढळराव पाटील यांच्यावर अन्याय करण्यासारखेच नाही तर संपूर्ण शिरूर मतदारसंघावर अन्याय करण्यासारखे आहे. असे काही निर्णय घेतले गेल्यास भविष्यात आम्ही नुसते जनआंदोलनच करणार नाही तर शिवसैनिकांना पर्यायाने आढळराव पाटील समर्थकांना त्याही पलीकडे जाऊन पक्षाबाबत वेगळा विचार करायला लागेल, असा इशारा देविदास दरेकर यांनी दिला आहे.
पुण्यातून का?
हकालपट्टी नाट्यानंतर मातोश्रीवरील बैठकीत आढळराव पाटील यांना जे सांगण्यात आले त्याबद्दल पक्ष संघटना म्हणून आमचे मत कोणीही जाणून घेतले नाही. ज्या मतदारसंघात आढळराव यांचा संपर्क आहे, जिथे त्यांनी पक्षसंघटना मजबुतीने बांधलेली आहे तो मतदार संघ सोडून पुण्यात का जायचे? आमच्या मतदारसंघातील शिवसैनिक आणि पदाधिकारी हे पुण्याच्या उमेदवारीबाबत अचंबित झाले असल्याचे आंबेगाव तालुकाप्रमुख अरुण गिरे यांनी सांगितले.
राष्ट्रवादीनेच पुण्यातून लढावे
महाविकास आघाडीमुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने आगामी लोकसभा निवडणूक पुण्यातून लढवावी आणि आढळराव पाटील यांना शिरूरमधून लोकसभेची उमेदवारी देण्यात यावी, असे पत्र वरिष्ठांना दिल्याचे शिवसेनेचे जिल्हा सल्लागार अनिल काशीद यांनी सांगितले.