बंगळुरू – भारतीय राष्ट्रीय लोकशाही सर्वसमावेशक आघाडी (इंडियन नेशनल डेमोक्रेटिक इंक्लूसिव अलायंस) म्हणजेच ‘इंडिया’. विरोधी पक्षांच्या नव्या आघाडीला हे नाव देण्यात आले आहे. बेंगळुरूमध्ये 26 विरोधी पक्ष एकत्र आले आणि 2024 साठी नवीन आघाडी स्थापन केली. यानंतर सर्वांनी एका व्यासपीठावर येऊन संयुक्त पत्रकार परिषद घेतली. पत्रकार परिषदेच्या सुरुवातीला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी या आघाडीच्या नावाची औपचारिक घोषणा केली. त्यांनी सांगितले की ‘इंडिया’ नावावर सर्व पक्षांचे एकमत झाले आहे.
यानंतर पत्रकार परिषदेत खर्गे यांनी आजची बैठक यशस्वी झाल्याचे सांगत पुढील टप्प्यातील बैठक मुंबईत होणार असून 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी दिल्लीत सचिवालय स्थापन करण्यात येणार असल्याचे सांगितले. खरगे म्हणाले की, केंद्र सरकार ईडी, सीबीआयसारख्या संस्थांचा गैरवापर करत आहे.
पुढील बैठकीत समन्वयकाचे नाव निश्चित केले जाईल –
या बैठकीत लोकशाही आणि देश वाचविण्यावर चर्चा झाल्याचे खरगे यांनी सांगितले. 11 सदस्यांची समिती स्थापन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्याच्या समन्वयकाचे नाव पुढील बैठकीत निश्चित केले जाईल.
आम्ही खरे आव्हान स्वीकारले आहे – ममता
ममता बॅनर्जी म्हणाल्या की, बैठक खूप चांगली झाली आहे. आजपासून आव्हान सुरू झाले आहे. आमच्या 26 पक्षांच्या बैठकीत आम्ही खरे आव्हान स्वीकारले आहे. ममता बॅनर्जींनी प्रश्न विचारला, ‘NDA तुम्ही भारताला आव्हान देऊ शकता का?’ ममता बॅनर्जी म्हणाल्या की, भारत जिंकेल, भाजप हरेल.
त्यांनी जमीन विकली, आकाश विकले – केजरीवाल
अरविंद केजरीवाल म्हणाले की, संख्या वाढत आहे ही चांगली गोष्ट आहे. यापूर्वी आम्ही पाटण्यातील सभेत जमलो होतो, आता जास्त लोक जमले आहेत. भाजपवर हल्लाबोल करताना केजरीवाल म्हणाले की, त्यांनी रेल्वे विकली, विमानतळ विकले, जमीन विकली, आकाश विकले. त्यांनी प्रत्येक क्षेत्र उद्ध्वस्त केले.
‘हुकूमशाहीविरोधात लोक एकत्र येत आहेत’ – उद्धव
उद्धव ठाकरे म्हणाले की, हुकूमशाही विरोधात जनता एकवटत आहे. लढा पक्षासाठी नाही, देशासाठी आहे. पुढच्या बैठकीत सर्व नेत्यांची पुन्हा मुंबईत बैठक होणार आहे.
एनडीए आणि ‘इंडिया’ यांच्यातील लढत – राहुल गांधी
राहुल गांधी म्हणाले की, आम्ही स्वतःला एक प्रश्न विचारला की ही लढाई कोणामध्ये आहे. तर हा लढा भाजपच्या विचारधारेविरोधात आहे. ही लढत एनडीए आणि ‘इंडिया’ यांच्यात आहे. देशात बेरोजगारी पसरत आहे. देशाची संपूर्ण संपत्ती काही हातात जात आहे.
पुढील बैठकीत निमंत्रक निश्चित होणार – खरगे
या पत्रकार परिषदेत या युतीचे नेतृत्व कोण करणार असा प्रश्न पत्रकाराने विचारला. त्याला उत्तर देताना खरगे म्हणाले की, आम्ही 11 जणांची समिती स्थापन करणार आहोत, ज्याचा समन्वयक मुंबईत होणाऱ्या पुढील बैठकीत ठरवला जाईल.