मुंबई – देशातील विरोधी पक्षांनी निर्धारपूर्वक एकत्र राहून लोकांच्या मनात आपल्या विषयीचा विश्वास निर्माण करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल सोनिया गांधी यांनी बोलावलेल्या बैठकीत केली, अशी माहिती शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी दिली.
सोनिया गांधी यांनी विविध राजकीय पक्षांच्या प्रमुखांची काल एक ऑनलाइन बैठक आयोजित केली होती. त्या बैठकीला 19 राजकीय पक्षांचे प्रमुख उपस्थित होते. त्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी वरील सूचना केली. संजय राऊत म्हणाले की, आजच्या घडीला विरोधकांमध्ये सत्ता हस्तगत करणे हा मुख्य हेतू नाही. तरीही जेव्हा सत्ता नजरेच्या टप्प्यात येईल त्यावेळी विरोधक एकत्र आणि ठाम राहतील, असा विश्वास जनतेला वाटला पाहिजे. त्यांच्या मनात तसा विश्वास निर्माण करण्याची कामगिरी सर्वच विरोधकांनी पार पाडली पाहिजे असेही उद्धव ठाकरे यांनी या बैठकीत नमूद केले असे ते म्हणाले.
काल सोनिया गांधी यांनी सर्व राजकीय पक्षांच्या प्रमुखांना व्यक्तिगतरित्या फोन करून या बैठकीला निमंत्रित केले होते, अशी माहितीही राऊत यांनी दिली. या बैठकीला बिगर भाजपशासित राज्यांचे चार मुख्यमंत्री उपस्थित होते. त्यात उद्धव ठाकरे यांच्याखेरीज ममता बॅनर्जी, एम. के. स्टॅलिन, हेमंत सोरेन यांचा समावेश होता.