तिरुअनंतपुरम – विरोधी पक्षांच्या नेत्यांनी नुकतीच पाटण्यात आघाडीसाठी जी बैठक घेतली होती, ते केवळ एक फोटो सेशन होते असे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी म्हटले आहे.
लोकांना घराणेशाही, तुष्टीकरण या राजकारणापेक्षा विकास हवा असेल तर त्यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठिंबा द्यावा असे आवाहनही त्यांनी केले आहे.
नढ्ढा यांनी यावेळी राहुल गांधी यांनी ब्रिटन मध्ये केलेल्या वक्तव्यांवरही जोरदार टीका केली. ते म्हणाले की, 200 वर्षांपेक्षा जास्त काळ भारतावर राज्य करणाऱ्या ब्रिटन मध्ये राहुल गांधी गेले आणि त्यांनी तेथे भारतात लोकशाही अस्तित्वात नसल्याचा सूर आळवला. पण त्यांच्या आजींनी म्हणजेच इंदिरा गांधींनी आणिबाणीच्या काळात हजारो निरपराध लोकांना तुरूंगात डांबले हा इतिहास ते विसरले.केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने येथे आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत बोलताना नढ्ढा म्हणाले, भारतात लोकशाही सुरक्षित आहे. तुम्ही स्वतःला वाचवा.
मोदींच्या विरोधात उभारल्या जाणाऱ्या आघाडीबाबत बोलताना नढ्ढा म्हणाले की, ते मोदींवर टीका करू शकतात आणि त्यांची निंदा करू शकतात, पण जगभरातील लोक मोदींचा उल्लेख “बॉस”, “हिरो”, “सुधारक” म्हणून करत आहेत आणि इतर कौतुकास्पद टिप्पण्यांसह मोदींना विविध राष्ट्रांकडून ऑर्डर ऑफ द नाईल सारख्या पुरस्कारांनी सन्मानित केले जात आहे, मोदींचे हे यश कॉंग्रेसला ते पचवता येत नाही म्हणून ते सातत्याने मोदींविषयी अपमानास्पद वक्तव्य करीत असतात असेही नढ्ढा यांनी यावेळी नमूद केले.
नढ्ढा यांनी यावेळी केंद्र सरकारने सुरू केलेल्या विविध कल्याणकारी योजना आणि उपक्रम तसेच त्यांच्या नऊ वर्षांच्या कारकिर्दीत हाती घेतलेल्या विकास प्रकल्पांचीही माहिती दिली.