मुंबई – विरोधी पक्ष सरकारला बदनाम करायच्या नादात राज्याच्या पोलीस दलाला बदनाम करायचे काम करीत आहेत असा टोला गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी काल विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना लगावला.
ते म्हणाले, आपल्या राज्यात गुन्हे दाखल होणे व सिध्द होण्याचे प्रमाण इतर राज्यांच्या तुलनेत अधिक आहे. नवाब मलिक हे राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रवक्ते म्हणून केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका करत होते यासाठी त्यांना बदनामीचा सामोरं जावे लागते आहे. याआधी जे सरकार होते तेव्हा त्यांना मलिक यांच्या बाबतीत काही दिसले नाही. मात्र आपल्याला शंभर टक्के खात्री आहे मलिक हे निर्दोष ठरतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
दिशा सालियन व इतर संबंधित विषयांवर भाष्य करणारे केंद्रीय मंत्री व इतर यांनी आपण सार्वजनिक जीवनात वावरतो हे लक्षात घेऊन जबाबदारीने वागावे असे आवाहन त्यांनी केले.रामनवमी आणि गुढीपाडवा मिरवणुकांसाठी जी मागणी आहे त्याबाबत ते म्हणाले, अद्याप करोना संपलेला नाही.संबंधीत मंत्री याबाबत बोलू शकतात.राज्य पोलीस दलाने आपला नावलौकिक वाढवावा असेही ते म्हणाले.