सांगली – पावसाळ्यात पाण्याखाली जात असल्याने पुणे बंगळूरू हा राष्ट्रीय महामार्गाला पर्यायी नवा राष्ट्रीय महामार्ग बांधण्याची घोषणा केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केली
गडकरी यांच्या हस्ते दोन राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात आले. सांगली ते सोलापूर या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 166 मधील बोरगाव ते वाटंबरे दरम्यानच्या 52 किलोमीटर लांबीच्या चौपदरीकरणाचा यामध्ये समावेश आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 965 वरील सांगोला ते सोनंद ते जत या मार्गाचा लोकार्पण सोहळा आज पार पडला.राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सांगली जिल्ह्यात 96.78 किमी लांबीच्या महामार्गाचे काम पूर्ण केले आहे. यासाठी 2 हजार 334 कोटी रुपये खर्च आला आहे.
गडकरी म्हणाले, पुणे ते बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग पावसाळ्यात बंद पडतो. भविष्यात आता या मार्गावर हे संकट येणार नाही. आपण पुणे ते बंगळूरू नवा राष्ट्रीय महामार्ग बांधण्याचे निश्चित केले असून 40 हजार कोटी रुपयांचा नवा रस्ता खंडाळा, फलटण, खानापूर, तासगाव, कवठेमहांकाळ या दुष्काळी टापूतून जाईल. भविष्यात मुंबई पुणे रस्ता पुण्याच्या रिंगरोडला जोडल्यानंतर हाच मार्ग मुंबई ते बंगळुरू असा होईल, अशा घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केली.
माझा अनुभव आहे की, मंत्र्यांना अडचणीत बायको नाहीतर मेव्हणा अडचणीत आणतो. नाहीतर चहापेक्षा किटली गरम असलेले खासगी सचिव. मी माझ्या मेव्हण्याला तुझे काम असेल तरच माझ्याकडे ये असे सांगितले. लोकांचे काम घेऊन नेतेगिरी करण्याचा तुझा संबंध नाही. तू या भानगडीत पडायचे नाही, असे नितीन गडकरी म्हणाले.
यावेळी सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी नितीन गडकरी यांचे तोंडभरून कौतुक केले. सांगलीत रस्ते उत्तम प्रकारचे केले आहेत, वेगळ्या देशात आलो असे वाटते. आपण वेगवेगळ्या पक्षात असलो तरी, विकास कामांसाठी कायम एकत्र येत असतो. खासदार संजय पाटील यांच्या खासदारकीच्या काळात नितीन गडकरी यांच्या माध्यमातून चांगले रस्ते झाले. चांगल्याला चांगले नाही म्हटले तर, पडळकर जरा प्रॉब्लेम तयार होतात, अशी मिश्किल टिप्पणी करत संजयकाका आणि पडळकर यांच्या वादाला पालकमंत्र्यांनी पुन्हा वाट करून दिली.
रस्ते या विषयात गडकरी साहेब यांनी अतिशय प्रभावीपणे काम केलं. गडकरी साहेबांनी ज्या ज्या ठिकाणी हात घातला ते प्रकल्प पूर्ण झाले, आशा शब्दांत जयंत पाटील यांनी गडकरींचं कौतुक केले.