सातारा -2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होण्यासाठी संसदेने संमत केलेले तीन कृषी कायदे फायदेशीरच ठरणार आहेत; परंतु राजकीय हेतूने प्रेरीत होऊन कॉंग्रेस व त्यांचे मित्र पक्ष शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहेत, असा आरोप केंद्रीय ग्राहक संरक्षण, अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केला.
साताऱ्यात भाजपच्यावतीने सोमवारी संवाद मेळावा घेण्यात आला. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
दानवे म्हणाले, संसदेच्या दोन्ही सभागृहांनी शेतीविषयक कायदे संमत केल्यानंतर त्यांना विरोधी पक्ष व विविध संघटनांकडून विरोध करण्यात येत आहे. विरोधकांनी घेतलेल्या आक्षेपांना कोणतीही वैचारिक बैठक नाही. राज्यसभेत रालोआ सरकारकडे बहुमत नसतानाही ही विधेयके संमत झाली.
सरकार शेतीमाल हमीभावाने खरेदी करणार नाही, हा कॉंग्रेस व मित्र पक्षांचा कांगावा आहे. कृषी विधेयकामुळे बाजार समित्या मोडकळीस येतील, ही कॉंग्रेसची अनाठायी भीती आहे. या कायद्यांमुळे शेतकऱ्यांना बाजार समित्यांच्या बाहेर माल विकायचा अधिकार मिळाला आहे.
या कायद्यांमुळे येत्या दोन वर्षात शेतीला उर्जितावस्था येऊन शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होणार आहे. शेतीच्या पायाभूत सुविधांसाठी मोदी सरकारने एक लाख कोटी रुपयांची तरतूद केली असून स्वामिनाथन समितीच्या 90 टक्के शिफारसी लागू केल्याचे सांगितले. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी मोदी सरकारने गेल्या सहा वर्षांत अनेक पावले उचलली आहेत. याचा भाग म्हणून संसदेमध्ये कृषिविषयक विधेयके मंजूर करण्यात आली. लोकसभेत विरोधकांचे काही चालले नाही आणि लोकांसमोर जाण्यासाठी दुसरा मुद्दाच नसल्याने कॉंग्रेस आणि मित्र पक्षांनी या कायद्यांना विरोध करायला सुरुवात केली आहे. त्यांचा विरोध राजकीय आकसातून आहे.
ते शेतकऱ्यांमध्ये अपप्रचार करत आहेत; परंतु शेतकऱ्यांमध्ये गैरसमज पसरविण्यात ते यशस्वी होणार नाहीत. सरकार शेतीमाल हमीभावानेच खरेदी करणार आहे. पत्रकार परिषदेस भाजपचे प्रदेश सरचिटणीस सूरजितसिंह ठाकूर, खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर, आ, शिवेंद्रसिंहराजे भोसले, आ. जयकुमार गोरे, ऍड. भरत पाटील, डॉ. अतुल भोसले, शहराध्यक्ष विकास गोसावी, जिल्हा सरचिटणीस विठ्ठल बलशेटवार उपस्थित होते.