मंचर -राज्य शासनाने मॉल, सुपर मार्केट, किराणा दुकानात वाइन विक्रीचा घेतलेला निर्णय तात्काळ मागे घ्यावा, अशी मागणी आंबेगाव तालुका भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलनाच्या वतीने घोडेगाव तहसील कार्यालयात निवेदन देऊन करण्यात आली.
घोडेगाव तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार दामुराजे असवले यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्य मंत्रिमंडळाने राज्यातील मॉल, सुपर मार्केट, किराणा दुकानात वाइन विक्रीला परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकरी-द्राक्ष
बागायतदार यांच्या हितासाठी, तसेच वाइन उद्योगाला चालना देण्यासाठी निर्णय घेतल्याचे सरकारने स्पष्ट केले असले तरी हे दिशाभूल करणारे आहे. या निर्णयामुळे लाखो कुटुंबांतील संसार उद्ध्वस्त होणार आहे.
हे महाराष्ट्र राज्याऐवजी मद्यराष्ट्र करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. या निर्णयामुळे गुन्हेगारांचे प्रमाणही वाढणार असल्याचा आरोप आंबेगाव तालुका भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलन न्यास समितीचे गोविंदराव खांडगे यांनी केला. नागरिकांच्या भल्यासाठी सरकारने हा निर्णय
तात्काळ मागे घ्यावा, अशी मागणी भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलन न्यास समितीचे सदस्य शांताराम वळसे पाटील, बबनराव वाळुंज, ऍड. सीताराम खांडगे, ऍड. लक्ष्मणराव डामसे, दत्तात्रय करंडे, गणेश हारके यांनी निवेदनाद्वारे केली आहे.