जामखेड: कर्जत येथे उमेदवारी अर्ज दाखल करताना मतदारांची झालेली उत्स्फूर्त गर्दी व त्यानंतर सर्व समाजातून मिळणारा पाठिंबा, गावभेट दौऱ्यात महिलांचा सहभाग, मुस्लिम समाज व युवकांचा ओढा यामुळे दिवसेंदिवस जनतेचे समर्थन वाढत आहे. त्यामुळे 21 तारखेनंतर रोहीत पवार यांचे पार्सल मतदारसंघात दिसणार नाहीत अशी खोचक टीका पालकमंत्री राम शिंदे यांनी प्रचारार्थ आयोजित केलेल्या सभेत बोलताना केली.
शिंदे यांनी प्रचारार्थ जामखेड तालुक्यातील दिसलेवाडी, सांगवी, मुसलमानवाडी, झिक्री, धोंडपारगाव,राजेवाडी, नान्नज, महारुळी, वाघा, पिपळगाव उंडा, आपडी, पिंपळगाव आवळा, राजुरी गावांना भेट दिली. यावेळी गौतम उतेकर, सुभाष आव्हाड, सोमनाथ पाचारणे, मनोज कुलकर्णी, विद्याताई मोहळकर, तुषार पवार, सचिन मलंगनेर, आश्रू खोटे, आजीनाथ हजारे, रवींद्र सुरवसे, महेश निमोणकर, तुकाराम मोहळकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
शिंदे म्हणाले, मागील पाच वर्षांत मंत्रीपदाच्या काळात मोठया प्रमाणावर निधी खेचून आणला. त्यातून मुलभूत समस्या सोडवल्या. पुढील काळात शेतीच्या पाण्यासाटी कृष्णा भिमा स्थिरीकरण योजना राबवू. साखर कारखाना काढून शेतकऱ्यांना न्याय द्यायचा असल्याचेही त्यांनी सांगितले.