सातारा – महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होऊ नये. शिवसेनेला महाआघाडीने पाठिंबा देऊन सत्ताकोंडी फोडावी. मात्र, महाराष्ट्रात भाजपचे सरकार येऊ नये. संविधान धोक्यात आणणारा भाजप हा आमचा नंबर एकचा शत्रू आहे. त्याला विरोध करणारच, असे रोखठोक प्रतिपादन महाराष्ट्र बहुजन वंचित आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष लक्ष्मण माने यांनी पत्रकार परिषदेत केले.
महाराष्ट्र बहुजन वंचित आघाडीचा मेळावा दि. 14 रोजी दुपारी बारा वाजता श्रावस्ती सांस्कृतिक केंद्र येथे होत असल्याचे त्यांनी सांगितले. या मेळाव्यात संघटनेची बांधणी, आंदोलनाची पुढील दिशा व पदाधिकाऱ्यांच्या निवडी आदी निर्णय घेतले जाणार आहेत. माने म्हणाले, कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला ऍड. प्रकाश आंबेडकर यांच्या बहुजन वंचित आघाडीने पाठिंबा दिला असता डॉ. बाबासाहेब आंबेडकर
यांच्या विचारधारेचे किमान पाच खासदार व 25 आमदार निवडून आले असते. भाजपला रोखण्यासाठी आम्ही ऍड. आंबेडकर यांच्या वंचित आघाडीत सामील झालो होतो. मात्र, त्यांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाण्याचे नाकारल्याने महाराष्ट्रात वंचितचे राजकीय नुकसान झाले. नव्या सरकारने बळीराजाच्या हिताचे निर्णय न घेतल्यास महाराष्ट्र बहुजन वंचित आघाडी राज्यव्यापी आंदोलन उभारणार आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्येही आघाडी पूर्ण ताकदीने उतरणार आहे. भाजप हा आमचा नंबर एकचा शत्रू आहे. अर्थव्यवस्थेची वाट लावणाऱ्या हिंदुत्ववादी अजेंड्याविरोधात आमची लढाई आहे. भाजपच्या विचारसरणीचा अंत झाला आहे. महाराष्ट्रात पीकपाण्याची दुर्दशा झाली असताना राज्यात सत्ता स्थापनेचा निर्णय होत नाही, हे दुर्दैवी आहे. राज्यात आघाडीने समन्वयाने सत्ता स्थापन करावी.
…तर आश्रमशाळा बंद करणार
परतीच्या पावसाने राज्यभरात रब्बी हंगाम वाया गेला आहे. राज्यातील आश्रमशाळांचा अन्नधान्य पुरवठा खंडित झाला आहे आणि आश्रमशाळा चालवणाऱ्यांनाच धान्य लिलाव घेण्यास भाजप शासन सांगत आहे. आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या पोषणाची जवाबदारी सरकारची आहे. या संदर्भात शासनाकडून निर्णय न झाल्यास राज्यातील आश्रमशाळा बंद करण्याचा इशारा लक्ष्मण माने यांनी दिला.