बेंगळुरू: कोलकातामध्ये या महिन्याच्या अखेरीस पहिला-वहिला भारत आणि बांगलादेश डे/नाईट कसोटी सामना होणार असून, या सामन्यात “गुलाबी चेंडू’ वापरला जाणार आहे. मात्र, संध्याकाळ सरल्यानंतर हा “गुलाबी चेंडू’ दिसण्यात अडथळा येऊ शकतो, असे मत भारताचा अव्वल फलंदाज चेतेश्वर पुजारा याने व्यक्त केले आहे.
येत्या 22 नोव्हेंबरपासून ईडन गार्डन्स येथे भारत-बांगलादेश डे/नाईट कसोटी सामना होत असून यावेळी “एसजीचा गुलाबी चेंडू’ पहिल्यांदाच वापरला जाईल.
पुजाराने एका संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, मी दुलीप ट्रॉफीमध्ये यापूर्वी गुलाबी बॉलसह खेळलो आहे. तो एक चांगला अनुभव होता. घरगुती पातळीवर गुलाबी चेंडूने खेळणे सुलभ होऊ शकते. मात्र आंतरराष्ट्रीय कसोटी सामन्यात या चेंडूच्या दृष्यमानतेविषयी (विज्युअल क्लिअरन्स) शंका उपस्थित होऊ शकते.
दोन्ही संघातील बहुतांश क्रिकेटपटू आपल्या कारकिर्दीत प्रथमच गुलाबी रंगाच्या चेंडूने खेळत असतील. मात्र, पुजारासह मयंक अग्रवाल, हनुमा विहारी आणि कुलदीप यादव यांना दुलीप ट्रॉफीमध्ये कुकाबुरा गुलाबी चेंडूने बरोबर खेळण्याचा अनुभव आहे.
पुजारा पुढे म्हणाला की, दिवसा दृष्यमानता ही समस्या नसेल तर संध्याकाळची वेळ आणि दिवे यामुळे ही दृष्यमानता निर्णायक ठरु शकते. दुपारचे संपणारे सत्र आणि संध्याकाळ थोडी कठीण असू शकेल. मनगटी फिरकी गोलंदाजांना निवडणे थोडे अवघड आहे. गोष्टी कशा बदलणार आहेत हे आम्हाला ठाऊक नाही. परंतु सामन्याआधी दोन-तीन सराव सत्रांनी गुलाबी बॉलबद्दल आपल्याला चांगली कल्पना येईल.