मुंबई – अक्षय तृतीयेला काही प्रमाणात तरी सोने खरेदी करण्याची परंपरा भारतात आहे. त्यामुळे ज्यांना परवडते असे लोक अक्षय तृतीयेला खरेदी करतात. मात्र या वर्षी लॉक डाऊनमुळे अक्षयतृतीयेला फक्त डिजिटल व्यवहार होण्याची शक्यता आहे. लग्नसराई आणि गुढीपाडव्याच्या काळात फारसे विक्री झालेली नाहीत. त्यामुळे ज्वेलर्स आता अक्षय तृतीयेला डिजिटल विक्रीच्या माध्यमातून मागणीची नोंदणी करतील आणि प्रत्यक्ष दागिने किंवा सोने लॉक डाऊन संपल्यानंतर उपलब्ध करतील.
एप्रिल महिन्यामध्ये ज्वेलर्सच्या एकूण वार्षिक उलाढालीपैकी 15 टक्के उलाढाल होते. कारण या महिन्यांमध्ये अक्षय तृतीया येत असते. मात्र यावर्षी ही उलाढाल फार कमी होण्याची शक्यता असल्याचे ऑल इंडिया जेम्स अँड ज्वेलरी डोमेस्टिक कौन्सिल या संस्थेचे अध्यक्ष अनंत पद्मनाभन यांनी सांगितले.
गेल्या सहा महिन्यापासून विविध कारणामुळे सोन्याचे दर जास्त आहेत. सध्या ते 45 हजाराच्या जवळपास आहेत. त्यामुळे भारतातील ग्राहकांनी गेल्या 6 महिन्यापासून सोन्याची खरेदी टाळली होती. त्यातच आता लॉक डाऊन सुरू आहे. त्या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी काही महिने लागू शकतात. त्यामुळे वर्षाच्या शेवटच्या सहा महिन्यातच थोडेफार व्यवहार होतील अशी परिस्थिती आहे असे पद्मनाभन म्हणाले.
सध्या ज्वेलर्सची दुकाने बंद आहेत. त्याचबरोबर त्यांचे कर्मचारीही जागेवर नाहीत. अशा परिस्थितीत काही ज्वेलर्स डिजिटल व्यवहाराद्वारा दागिन्याची नोंदणी करत आहेत. प्रत्यक्ष पेमेंट आणि दागिने लॉक डाऊन संपल्यानंतर देण्यात येतील. मात्र हे किती काळ चालेल आणि किती यशस्वी होईल याबाबत शंका आहे. कारण दागिन्याचा ग्राहक हा हौशी असतो. त्याला प्रत्यक्ष दागिना पाहायचा असतो किंवा त्याच्या इच्छेप्रमाणे करून घ्यायचा असतो.
त्यामुळे अशा प्रकारच्या व्यवहाराला निश्चितच मर्यादा आहेत. मात्र सध्याच्या परिस्थितीत दुसरा कुठलाही पर्याय उपलब्ध नाही असे ते म्हणाले. जागतिक सुवर्ण परिषदेचे भारतातील प्रमुख सोमसुंदरम पी आर यांनी सांगितले की, जागतिक बाजारात सोन्याचे दर अस्थिर आहेत. त्यामुळे स्थानिक पातळीवर उत्पादकांना तग धरून राहण्यासाठी मोठी सूट द्यावी लागत आहे. सध्याच्या परिस्थितीत दागिने उत्पादकाकडे प्रत्यक्ष सोन्याची उपलब्धता मर्यादित आहे. बरेच कारागीर आपल्या गावी गेले आहेत. त्यामुळे हा उद्योग सध्यातरी अभूतपूर्व परिस्थितीतून जात आहे.
ते म्हणाले की, भारतात अक्षय तृतीयेला खरेदी करणारे ग्राहक डिजिटल व्यवहाराद्वारा काही प्रमाणात सोने खरेदी करण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर काही ग्राहक प्रतीकात्मक रित्या साधी सुटसुटीत ज्वेलरी खरेदी करू शकतात.
काही ज्वेलर्सने सांगितले की, आमच्याकडे अक्षय तृतीयेसाठी 20 एप्रिल पासूनच मोठ्या प्रमाणात ग्राहकांची विचारणा होऊ लागली आहे. सध्याच्या परिस्थितीत कसे व्यवहार करता येतील याबाबत आम्ही आणि ग्राहक ठरवत आहोत. आम्ही अक्षय तृतीय मध्ये काही प्रमाणात तरी व्यवहार होतील याबाबत आशावादी आहोत.