हर्षद कटारिया
बिबवेवाडी – महानगरपालिकेची निवडणूक यावर्षी फेब्रुवारी महिन्यांत होणार होती ती जवळपास एक वर्ष पुढी ढकलली गेली आहे.राजकारणात दररोज नवी उलथापालथ होत आहे. राज्यातील राजकीय गणिते फिरल्याने मुख्यमंत्री बदल झाल्यामुळे आता स्थानिक महानगरपालिकेची प्रभाग रचना बदलली जाणार? भाजपचे शहरातील मुख्य पदाधिकारी प्रभाग रचना बदलण्यासाठी मोठ्या हालचाली करीत असल्यामुळे निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ऑफिस थाटून “तयारी’ करणारे इच्छुक उमेदवार आता मात्र मेटाकुटीला आले आहेत. “इच्छुकां’च्या मनात सध्या तरी विविध शक्यतेमुळे फक्त “आदळ-आपट’च सुरू असून निवडणूक रिंगणात “टिकून’ राहण्याचे आव्हान पेलावे लागत आहे.
पर्वती मतदारसंघात निवडणूक डोळ्यासमोर ठेवून गेल्या वर्षीपासून मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी कामे करीत असलेले इच्छुक आता राजकीय घडमोडींमुळे पुरते वैतागले आहेत. निवडणूक कधी होणार, याबाबतचे चित्र स्पष्ट होत नसल्याने सर्वच नियोजन फिस्कटले आहे. चकचकीत कार्यालय, त्यात काम करणारे तीन-चार कर्मचारी, येणाऱ्या-जाणाऱ्यांना चहापाणी, उठबस करणाऱ्या कार्यकर्त्यांना नाष्टा यासह काहींनी तर जमेल तसे अहवालही छापून ठेवले आहेत.
यासह दररोजचा वाढीव खर्च करावा लागत असल्याने इच्छुक उमेदवारांची निवडणुकीचे बजेट वाढू लागले आहे. त्यातच राज्यपातळीवर राजकारण सतत बदलत आहे. सध्या तरी राज्य पातळीवर राजकीय वातावरण अस्थिर असल्याने “इच्छुकांना’ आपली कार्यालये सुरूच ठेवावी लागणार आहेत.
प्रामाणिकपणे सामाजिक सेवा सुरूच…
मागील तीन ते चार वर्षांपासून अगदी करोना काळातही “सामाजिक बांधिलकी’ जपत नागरिकांची शासकीय कामे करणे, शासकीय योजना पोहचवणे, आधार कार्ड, रेशन कार्ड करून देण्यास मदत करणे, आरटीई सारख्या मोफत शिक्षण शासकीय योजना बाबत जनजागृती करणे, गरजूंना मदत करणे, पाणी पुरवठा, ड्रेनेज सफाई, खड्डे, झाडे पडल्यास मदत कार्य पोहचवणे याबाबत प्रशासकीय दरबारी पाठपुरावा करणे, असे उपक्रम पर्वती मतदारसंघात अनेक कार्यकर्ते प्रामाणिकपणे राबवित आहेत त्यामध्ये निवडणूक काळ पुढे गेला तरी खंड पडलेला नाही.
‘फ्लेक्स’पुरते असलेले “इच्छुक’ गायब
निवडणूक काळात जोरदार वाढदिवस साजरा करणारे, फक्त निवडणुकीच्या काळात मंडळांना वर्गणी देताना हात खुला सोडणारे, विविध वस्तूंचे वाटप करणारे, फक्त चमकोगिरी करत फ्लेक्सवर लाखो रुपये खर्च करणारे, सोशल मीडियावर राजकीय विरोध करत समस्या मांडणारे “इच्छुक’ नागरिकांच्या समस्येवर कधीच न बोलणारे इच्छुक फक्त फ्लेक्स, फोटो, राजकारण, वाढदिवस सोशल मीडिया पुरतेच मर्यादित होते, राजकीय स्थिती बदलत असल्याने ते आता गायब झाले आहेत.