वाघोलीत ग्रामसभा तहकूब : 31 डिसेंबरला तहकूब सभा होणार
वाघोली – कचरा प्रक्रिया प्रकल्प मंजुरी, विकास आराखड्यांच्या विषयासह वाघोली ग्रामपंचायतीची सोमवारी (दि.23) रोजी बोलविलेली ग्रामसभा गणसंख्येअभावी तहकूब करण्यात आली. ग्रामसभेला किमान 100 गणसंख्या आवश्यक असताना अवघे 80 ग्रामस्थ उपस्थित असल्याने तहकूब ग्रामसभा मंगळवार (दि.31) डिसेंबर रोजी बोलाविल्याचे ग्रामविकास अधिकारी मधुकर दाते यांनी सांगितले.
ग्रामसभेत आमचा गाव आमचा विकासचे अंतर्गत 2020-21 चा वार्षिक आराखडा व 2020-21 ते 2024-25 पंचवार्षिक आराखडा मंजूर करणे, 2020-21 चा वार्षिक अंदाजपत्रकास मंजुरी देणे, ग्रामपंचायत जिल्हा परिषद व शासनाकडील विविध योजनांसाठी लाभार्थ्यांची निवड शिफारस, चालू व नवीन विकासकामांचा आढावा, कचरा प्रक्रिया प्रकल्प अहवालास मंजुरी, आदी विषयांवर चर्चा होणार होती. मात्र, गावकऱ्यांनी ग्रामसभेकडे पाठ फिरविली. त्यामुळे ग्रामसभा तहकूब करण्याची वेळ ग्रामपंचायत प्रशानावर आली.
दरम्यान, गावातील प्रश्न लोकसहभागातून निकालात निघावेत तसेच सर्वांमध्ये समन्वय साधावा, या हेतून प्रेरित असलेली ग्रामसभा आता शोपीस ठरत असल्याचे चित्र जिल्ह्यात दिसत आहे. अनेक गावांत पदाधिकारी आणि तुरळक नागरिकच ग्रामसभेला उपस्थि राहत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांना कागदोपत्री रंगविण्याची वेळ आली आहे.
एकूण मतदारांपैकी 0.002 नागरिकांची उपस्थिती
वाघोलीत भेडसावणाऱ्या विविध समस्या मांडण्यासाठी नागरिकांना हक्काचे व्यासपीठ म्हणून ग्रामसभा आहे. मात्र, याकडे नागरिक पाठ फिरवित असल्याचे वारंवार घडत आहे. कामात अडचणी आल्या, लाभार्थी निवड, अतिक्रमण कारवाई किंवा तंटामुक्त समिती निवड असेल तरच ग्रामसभांना गर्दी होते.
ग्रामपंचायतीच्या कामांबाबत फक्त सोशल मीडियातून पोस्ट टाकून धन्यता मानणारे नागरिक ग्रामसभेत येऊन प्रश्न का मांडत नाहीत, असा सवाल उपस्थित नागरिकांनी केला. विकास आराखडा व कचऱ्यासारख्या गंभीर विषयावर चर्चा होणार असल्यामुळे नागरीकांनी उपस्थित राहणे आवश्यक आहे.
मात्र, त्याकडेही नागरिकांनी कानाडोळा केला. 40 हजार मतदार आणि दीड लाखांच्या आसपास लोकसंख्या असलेल्या नागरिकांपैकी फक्त 80 नागरिक उपस्थित होते. एकूण मतदारांपैकी 0.002 नागरिकांची उपस्थिती ग्रामसभेदरम्यान होती.