पूर्व हवेलीतील शेतकरी चिंताग्रस्त
उरुळी कांचन -पूर्व हवेली तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील गहू पिकावर तांबेरा पडला आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. गहू, हरभरा, तरकारी पिकांना याचा सर्वाधिक फटका बसला आहे.
हवेली तालुक्यातील यशवंत सहकारी साखर कारखाना गेल्या आठ वर्षांपासून बंद आहे. त्यामुळे उरुळी कांचन, थेऊर, सोरतापवाडी परिसरातील शेतकरी ऊस शेतीला फाटा देत तरकारी पिके घेऊ लागला आहे. तत्कालीन राज्य सरकारने यशवंत सहकारी साखर कारखाना सुरु न केल्याने अनेक शेतकरी ऊस गुऱ्हाळ तसेच इतर कारखान्याला देऊ लागला आहे. उसाला बाजारभाव नसल्याने शेतकरी ज्वारी, बाजरी, तसेच भाजीपालाचे उत्पादन घेऊ लागला आहे.
मात्र, यावर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने बाजरी तसेच इतर पिके वाया गेली आहेत. दोन महिन्यांनंतर पाऊस उघडल्याने प्रत्येक शेतकऱ्यांनी उसाऐवजी भाजीपाला तसेच गव्हाची पेरणी केली आहे. सध्या काही ठिकाणी गव्हाला पाणी देण्याचे काम सुरू आहे. काही ठिकाणी घरच्या घरी खुरपणी सुरू केली आहे.
मात्र, तीन दिवसापासून ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने पुन्हा शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. गव्हावर तांबेरा पडल्यामुळे शेतकऱ्यांना औषध फवारणीचा खर्च माथ्यावर पडला आहे. शेतकरी चिंतेने ग्रासला आहे.