लाखनगाव, (वार्ताहर) – आंबेगाव तालुक्यात सध्या अवकाळी पावसाचे वातावरण तयार झाल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांची तारांबळ उडाली असून पावसापासून कांद्याचे संरक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे.
प्लास्टिकचा कागद,ताडपत्री याच्या सहाय्याने शेतकरी वर्ग कांदा झाकून ठेवत आहे. परंतु जोरात सुटणारे वारे यामुळे शेतकऱ्यांना कसरत करावी लागत आहे. महाग असणारे कागद खरेदी करून कांदे झाकावे लागत आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग वैतागला असून आर्थिक खर्चात वाढ झाली आहे.
असे पारगाव येथील कांदा उत्पादक शेतकरी ज्ञानेश्वर ढोबळे यांनी सांगितले.आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात सध्या कांदा काढण्याच्या कामांना वेळ घेतला असून जवळपास ८० टक्के कांदा काढण्याची कामे उरकली आहेत.
परंतु कांदा काढल्यानंतर आरण करून साठवलेला कांदा पावसामुळे भिजण्याची शक्यता आहे. कांदाचाळीमधे साठवण्याआधी दहा दिवस कांदा मुरून दिला जातो आणि सध्या शेतात आरण लावून ठेवलेला कांदा अचानक येणाऱ्या पावसामुळे भिजत आहे. या अवकाळी पावसाचा फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसला असून आरणीत साठवलेला कांदा पावसापासून संरक्षण होण्यासाठी कागदाच्या सहाय्याने शेतकरी झाकून ठेवत आहेत.परंतु कागद किंवा ताडपत्री खरेदी करून शेतकऱ्यांना हा कांदा झाकावा लागत आहे.
त्यामुळे आर्थिक खर्च वाढत असून भांडवली खर्चात वाढ होत आहे. तर प्लॅस्टिकचा कागद वारे सुटल्यानंतर मोठ्या प्रमाणावर उडतो. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करून कांदा झाकावा लागत आहे. सध्या काही शेतकऱ्यांनी कांदा चाळीमध्ये कांदा साठवला आहे.
परंतु बऱ्याचशा शेतकऱ्यांचे कांदे अजूनही चाळीच्या बाहेर म्हणजेच शेतात आहेत. कांदाचाळीमध्ये कांदा साठवण्यासाठी शेतकऱ्यांला मजूर मिळत नाहीत.त्यामुळे अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची तारांबळ वुडत आहे. त्यामुळे कांदा झाकून ठेवण्यासाठी शेतकऱ्यांना कसरत करावी लागत आहे. कांदा उत्पादक शेतकरी मेटाकुटीला आला असून, कांद्याचे पडलेले बाजार भाव आणि त्यात अवकाळीचा बसणारा फटका यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत आहे.