पुणे – साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेली अक्षय्यतृतिया शनिवारी साजरी केली जाणार आहे. अक्षय्यतृतीया हा साडेतीन मुहूर्तांपैकी पूर्ण मुहूर्त मानला जातो. याच दिवशी सत्य म्हणजेच कृतयुग आणि त्रेतायुग या दोन्ही युगांचा आरंभ झाला म्हणून याला “युगादी’ असेही म्हणतात.
या दिवशी आंबा फळाची पूजा केली जाते. तसेच अनेकजण याच दिवसापासून आंबे खाण्याला सुरूवात करतात. घराला आंब्याच्या पानांचे तोरण लावले जाते. याशिवाय आमरस पुरणपोळी असा बेतही नैवेद्यासाठी केला जातो.
याशिवाय हा साडेतीन मुहूर्तापैकी एक असल्याने या दिवशी शुभकार्याची सुरूवात केली जाते. सोने, वाहन, फ्लॅट खरेदी किंवा अन्य खरेदी या दिवशी केली जाते. घरात एखादे मंगलकार्य असेल तर त्याचा मुहूर्तही या दिवशी केला जातो.
अन्य सणांप्रमाणेच अक्षय्यतृतियेसंबंधीही अनेक कथा प्रसिद्ध आहेत. याला शास्त्रीय आधार नाही, परंतु पुरातन काळापासून यातील काही गोष्टी या पुढच्या पिढ्यांकडे संक्रमित होत आल्या आहेत. श्रीविष्णूच्या 24 अवतारांपैकी परशुराम हा अवतार पृथ्वीतलावर अक्षय्यतृतियेच्या दिवशी प्रकट झाले. याच दिवशी श्रीवेदव्यासांनी महाभारत लेखनास प्रारंभ केला. याच दिवशी पवित्र अशी गंगा नदी स्वर्गातून पृथ्वीवर अवतरली. अक्षय्यतृतीयेच्या या दिवशी पितृपुजनही केले जाते.