मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आज घाटकोपरमध्ये शिबिर आयोजित करण्यात आलं होत.राष्ट्रवादीच्या अनेक बड्या नेत्यांनी भाषणे केली त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सुद्धा कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी मुंबई आणि मुंबईकरांबद्दल दिलखुलास गप्पा मारल्या.
मुंबईने आपल्याला काय दिले? तिचे आणि आपले नातं काय? या सर्व गोष्टींवर चर्चा करत त्यांनी मुंबई बद्दलच्या आठवणींना उजाळा दिला आहे.जरा हटके जरा बचके ये है मुंबई मेरी जान.. असे म्हणत मुंबई विषयी असलेला जिव्हाळा यावेळी सुळे यांनी बोलून दाखवला. तसेच मुंबईचा माणूस घडाळ्याकडे बघत असतो, घडाळ्याच्या काट्यावर त्याचं आयुष्य चालतं. परंतु आता हाच परिणाम पुढच्या निवडणुकीतही दिसला पाहिजे. त्याने नुसतं घडाळ्याला पाहायचं नाही तर घडाळ्याचं बटनही दाबायचं असे प्रतिपादन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले.
मुंबईने मला सगळं काही दिलं-
आम्ही १९७१ साली मुंबईत आलो. आम्ही मुंबईचे ओरिजनल नाही. जवळपास ५० वर्षे झाली आम्ही येथेच राहतो. या शहराने आम्हाला काय नाही दिलं? शिक्षण, आरोग्य, सुख-सुविधा दिल्या.नवराही मुंबईमध्येच भेटला आणि पोरंही मुंबईच्या हॉस्पिटलमध्येच झाली. आयुष्यात सर्वकाही मुंबईनेच दिलं आहे. या लोकांचे ऋणानुबंध मी कधीच विसरणार नाही,”असे म्हणत सुप्रिया सुळे यांनी मुंबईबद्दलचे प्रेम व्यक्त केले.