पुणे – एकमेकांवर चिखल फेकणारे आज मांडीला मांडी लावून बसले आहेत. त्यामुळे राजकारणात विश्वासार्हता राहिलेली नाही. मतदारराजा या सर्व गोष्टी बारकाईने पाहत असून, लक्षात ठेवत आहे. त्यामध्ये आगामी निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाकडे पाहण्याचा दृष्टीकोन चांगला आहे. पक्षाने कोणत्याही अन्य पक्षाशी युती न करता स्वबळावर निवडणूक लढवावी, अशी मागणी राज्यभरातील मनसे कार्यकर्त्यांनी पुण्यात पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या मेळाव्यात केली.
मनसेचा पदाधिकारी हा प्रथम कार्यकर्ता असतो. त्याच्याकडे पद नसले तरी तो काम करतच असतो. तळागळातील सामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी मनसे सदैव तत्वर असल्याने पक्ष वाढत आहे, अशी भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. पक्ष म्हणून नागरिकांना सामोरे जाताना सुरुवातीला अनेक अडचणी आल्या. पराभवाचे धक्के सहन करावे लागले.
परंतु, खचून न जाता प्रयत्न करीत राहिल्याने आज यश मिळाले, असे काही ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी यावेळी सांगितले. ग्रामीण भागात मनसेचे काम करताना शाखा उघडताना काय काय अडचणी आल्या त्यावर काय उपाय केले, याची माहिती यावेळी उपस्थित सरपंचांनी दिली. हिंमत केली त्याची किंमत होते, हे आपल्याला आजपर्यंतच्या यशावरून दिसते, असेही मत यावेळी पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले.
पक्षाने ग्रामीण भागातही लक्ष द्यावे
केवळी शहरी भागात लक्ष केद्रीत न करता पक्षाच्या नेत्यांनी ग्रामीण भागातही लक्ष द्यावे. त्यामुळे तळागळातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साह येतो, असे मनोगतात सांगितले. ग्रामीण भागात काम करताना अनेक आव्हाने येतात. त्यासाठी नेत्यांनी शहर किंवा ग्रामीण असा भेदभाव न करता पक्ष वाढीसाठी काय काम करता येईल यासाठी प्रोत्साहन द्यावे, अशी मागणी करण्यात आली.