मुंबई – वेदांता-फॉक्सकॉन सेमीकंडक्टर प्रकल्प गुजरातमध्ये स्थलांतरित झाल्यानंतर राजकारण तापले आहे. त्यातच रायगडमधील बल्क ड्रग पार्क प्रकल्पही महाराष्ट्राबाहेर स्थलांतरित करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा दावा आदित्य ठाकरे यांनी केला आहे. दावोसमधून तीन दिवसांत 80 हजार कोटी आणल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले.
आदित्य ठाकरे म्हणाले, बल्क ड्रगमध्ये सरकार पावणेतीन हजार कोटी गुंतवणूक करणार होती. नव्या घटनाबाह्य बेकायदेशीर सरकारने 40 आमदारही तिकडे नेले आणि दोन मोठे प्रकल्पही तिकडे नेले. केंद्राबरोबर नीट सांगड घातल्यास सर्व शक्य आहे. पण यांचे कारभारात लक्ष नाही. बल्क ड्रगमुळे 80 हजार रोजगार निघून गेले आहेत.
अजून तरूण शांत आहेत पण त्यांचा अंत नका पाहू नका. बल्क ड्रग पार्कही आपल्याकडून कसा काय गेला? एकही गुंतवणूक केंद्राच्या परवानगीशिवाय येऊ शकत नाही. मग केंद्राला पाठपुरावा करून आम्ही आणले मग यांना का जमत नाही?
रायगडमध्ये बल्क ड्रग पार्क प्रकल्प येणार होता. त्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केंद्र सरकारला पत्र लिहले होते. तसेच सुभाष देसाई यांनी त्याबाबतचा प्रस्ताव कॅबिनेटमध्ये आणला होता. मात्र, केंद्र सरकाराने गुजरात, आंध्रप्रदेश आणि हिमाचलला बल्क ड्रग पार्कबाबात विचारणा केली आहे. त्यात आता गुजरातमधील भरूचमध्ये हा बल्क ड्रग पार्क सुरु होणार आहे, अशी माहिती आदित्य ठाकरेंनी दिली.
तरुणांसोबत गद्दारी करू नको
मुख्यमंत्री मंडळांना भेट देत आहेत. मात्र, त्यांना अनेक प्रकल्पांबाबत माहिती नाही. नाणारबद्दल स्थानिकांचा विरोध होता, पण वेदांता आणि बल्क ड्रग प्रकल्पाला विरोध नव्हता, मग जाऊ का दिला? यासाठी केंद्र सरकारसोबत नीट चर्चा झाली असती तर झाले असते, पण या सरकारचे लक्ष नाही, कोणाचेही नियंत्रण नाही.
रोजगार निघून जात आहेत. आमच्यासोबत गद्दारी केली तशी या राज्यातील तरुणासोबत गद्दारी करू नका. या सरकारला खंजीर खुपसता येतो, पण लोकांच्या हिताची काम करता येत नाहीत, असे म्हणत आदित्य ठाकरेंनी सरकारवर निशाणा साधला.