ठाणे – राज्यात एखादा उद्योग आणायचा असेल तर, त्यासाठी उच्च अधिकार समितीची बैठक घेऊन त्यात मान्यता घ्यावी लागते. “फॉक्सकॉन’च्या प्रकल्पासाठी महाविकास आघाडीने अशी कोणतीही बैठक घेतलेली नव्हती. शिंदे आणि फडणवीस सरकारने सत्तेवर येताच अशी बैठक घेऊन कंपनीला भरीव पॅकेज देण्याचा निर्णय घेतला होता, असा दावा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केला.
तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चर्चा केली असून त्यादरम्यान मोदी यांनी “फॉक्सकॉन’ पेक्षा मोठा प्रकल्प महाराष्ट्राला देणार असल्याचे सांगितले आहे, असा दावाही त्यांनी केला आहे.
ठाणे येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या पत्रकार परिषदेत त्यांनी विरोधकांच्या टिकेला उत्तर दिले.
उदय सामंत म्हणाले, महाविकास आघाडी सरकारच्या काळात उद्योग विभागाचे जे मंत्री होते, त्यांनी 7 जानेवारी 2020 मध्ये ही कंपनी महाराष्ट्रात येऊ शकत नाही, असे म्हटले होते. तसेच ही कंपनी महाराष्ट्रात येणारच नाही, हे ठरवूनच ते कामाला लागले होते. त्यामुळे आता कंपनी दुसरीकडे गेली तर गवगवा कशासाठी करत आहेत, असे सांगत सामंत यांनी सुभाष देसाईंवर टिका केली.
फॉक्सकॉन’च्या प्रकल्पासाठी शिंदे आणि फडणवीस सरकारने सत्तेवर येताच बैठक घेऊन कंपनीला भरीव पॅकेज देण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, महाविकास आघाडीने सहा महिन्यांपुर्वीच उच्च अधिकार समितीची बैठक घेऊन निर्णय घेतला असता तर, ही वेळ आली नसती. हा प्रकल्प गुजरातला गेल्याचे दु:ख आम्हालाही आहे. पण, त्याचे राजकारण करू नये, असेही त्यांनी स्पष्ट केले.
लॉजेस्टीक पार्क उभारणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चर्चा केली असून त्यादरम्यान मोदी यांनी “फॉक्सकॉन’ पेक्षा मोठा प्रकल्प महाराष्ट्राला देणार असल्याचे आश्वस्त केले आहे, असा दावा करत मोदी दिलेला शब्द पाळता, हे सर्वांना माहिती असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत चर्चा झाली असून रत्नागिरी, भिवंडी, जालना, पुणे याठिकाणी लॉजेस्टीक पार्क तयार करण्यात येणार आहेत. त्यामुळे अनेकांना या माध्यमातून नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत, असेही ते म्हणाले.