नगर -करोनाच्या संकटात सरकारी उपायोजनांसाठी संत निरंकारी मिशनतर्फे तब्बल साडेपाच कोटी रुपयांचा मदतनिधी देण्यात आल्याची माहिती नगरच्या निरंकारी मंडळातर्फे प्रसिद्धीप्रमुख किशोर खुबचंदानी यांनी दिली. त्यात मुख्यमंत्री सहायता निधीसाठी 50 लाख व पंतप्रधान सहायता निधीसाठी पाच कोटी रुपये दिल्याचे खुबचंदानी यांनी सांगितले.
निरंकारी सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली हा मदतनिधी गोळा करण्यात आला असून, आता गरजुंना जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा करण्यासाठी संत निरंकारी मिशनने कंबर कसली असल्याचे खुबचंदानी यांनी सांगितले. लॉकडाऊनच्या काळात हातावर पोट असलेल्यांसाठी प्राधान्याने ही मोहीम राबविण्यात येणार आहे. अशा लोकांचा शोध घेऊन त्यांच्यापर्यंत जीवनावश्यक वस्तू पोचवण्याबाबत मिशनच्या सर्वच शाखांमधील भक्तगण आणि सेवादल स्वयंसेवक मदतकार्यासाठी पुढे सरसावले आहेत.
लॉकडाऊन कालावधीत पुरतील इतके तांदूळ, गव्हाचे पीठ, डाळ, मीठ, साखर, तेल, मसाला, बिस्किटे, चहा अशा विविध जीवनावश्यक वस्तूंचा त्यात समावेश आहे. मिशनच्या शाखांकडून पोलिस दल, आरोग्यविभाग प्रशासकीय सेवांमध्ये संलग्न असलेल्या कर्मचाऱ्यांसहित गरजू लोकांनाही भोजन आणि चहापान देण्याची सेवा सुरु करण्यात आली आहे.
आणीबाणीच्या प्रसंगी गरज भासेल, हे गृहीत धरुन सोशल डिस्टंसिग पाळून मिशनतर्फे रक्तदानाचे उपक्रम राबविले जाणार आहेत. गरज पडल्यास सत्संग भवने क्वारंटाईन रुग्णांसाठी उपलब्ध करुन देण्याची तयारी करण्यात आली आहे. तेथे दाखल होणाऱ्या संशयितांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात येणार आहे. संकटकालीन परिस्थितीत देशाबरोबर उभे राहण्याची प्रतिज्ञा संत निरंकारी मंडळाच्या भक्तगणांनी केली आहे. तसेच करोनाचे संकट लवकरात लवकर दूर म्हणून व्हावे, म्हणून मिशनच्यावतीने प्रार्थनाही करण्यात येत आहेत.