सातारा, (प्रतिनिधी)- माण तालुक्याच्या उत्तर भागातील ३२ आणि प्रस्तावित १६ गावांना पाणी देण्यासाठीच्या आंधळी उपसा सिंचन योजनेची कामे प्रगतीपथावर आहेत. पंपगृहाचे ५० टक्के, ३३ किलोमीटर लांबीच्या पाइपलाइनचे काम ८० टक्के तर ५२ किलोमीटर लांबीच्या पाइपलाइनचे काम ३० टक्के झाले आहे. या योजनेची उर्वरित कामे लवकरात लवकर मार्गी लावून जनतेला दिलेला शब्द पूर्ण करणार आहे, अशी ग्वाही आमदार जयकुमार गोरे यांनी दिली.
माण तालुक्याच्या उत्तर भागातील ३२ गावांना जिहे कठापूर योजनेचे पाणी देण्यासाठी मंजूर असलेल्या आंधळी उपसा सिंचन योजनेच्या सुरु असलेल्या कामांच्या पाहणीदरम्यान ते बोलत होते. यावेळी डॉ. संदीप पोळ, हरिभाऊ जगदाळे, विलासराव देशमुख, लुनेश विरकर, कृष्णा सिंचन विभागाचे अधिकारी, आणि भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते. माण तालुक्याच्या उत्तर भागातील अनेक गावे कोणत्याच पाणीयोजनेच्या लाभक्षेत्रात येत नव्हती.
आ. गोरे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आंधळी धरणात येणारे जिहे कठापूर उपसा सिंचन योजनेचे पाणी उचलून माणच्या उत्तर भागाला देण्यासाठीची वाढीव योजना प्रस्तावित केली होती. त्यावर तात्काळ सर्वेक्षण होऊन या योजनेला मान्यता देण्यात आली होती.
या योजनेसाठी ३७० कोटींचा निधीही मंजूर करण्यात आला होता. राज्यात सत्तांतर झाल्यावर ही योजना श्रेयवादात अडकली होती. या योजनेच्या कामांची निविदा प्रक्रिया रखडली होती. पुन्हा भाजप महायुतीचे सरकार येताच या योजनेच्या कामांना सुधारित प्रशासकीय मान्यता आणि वाढीव निधी देऊन गती देण्यात आली. गेल्या जूनमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या योजनेच्या कामांचा शुभारंभ करण्यात आला होता.
आंधळी धरणात आलेले जिहे कठापूर योजनेचे पाणी ७१० अश्वशक्तीच्या दोन पंपांद्वारे उचलून माणच्या उत्तर भागातील ३२ गावांना देण्यात येणार आहे. त्यासाठीच्या पंपगृहाचे काम ५० टक्के झाले आहे. ३३ किमी लांबीच्या पाइपलाइनचे ८० टक्के तर ५२ किमी लांबीच्या पाइपलाइनचे काम ३० टक्के झाले आहे. आंधळी उपसा सिंचन योजनेद्वारे ११०५५ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे.
आ. जयकुमार गोरे यांनी या योजनेच्या सुरु असलेल्या कामांची पाहणी करुन कृष्णा सिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली. आ. गोरे म्हणाले, माणच्या उत्तर भागातील लाभक्षेत्रापासून वंचित गावांना जिहे कठापूर योजनेचे पाणी देण्याचा मी शब्द दिला होता. आंधळी उपसा सिंचन योजनेचा प्रस्तावाला विक्रमी कमी कालावधीत मान्यता मिळवली. निधी मंजूर होऊन निविदा प्रक्रियेपर्यंत वाटचाल झाल्यावर अडीच वर्षे आघाडी सरकारने या योजनेला आडकाठी आणली.
आमचे सरकार आल्यावर या योजनेची कामे वेगाने सुरु केली आहेत. दिलेल्या शब्दाप्रमाणे जिहे कठापूरचे पाणी आंधळी धरणात आणले आहे. आता हे पाणी उत्तर भागातील ३२ गावांना देऊन वचनपूर्ती करणार आहे. आणखी प्रस्तावित १६ गावांचे सर्वेक्षण सुरु आहे. त्यासाठी पाणीही आरक्षित झाले आहे. लवकरच या गावांनाही पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
आंधळी सिंचन योजनेच्या कामांचे कुतुहल….
माणच्या उत्तर भागातील गावांचा कोणत्याच पाणीयोजनेच्या लाभक्षेत्रात समावेश होणार नाही असे अनेक नेते म्हणायचे. मात्र, आ. जयकुमार गोरे यांनी चिकाटीने जिहे कठापूरचे पाणी या भागाला देण्याची योजना मार्गी लावली. वाढीव पाण्याची तरतूदही करुन घेतली.
आपल्या भागाला लवकरच पाणी मिळून दुष्काळ दूर होणार असल्याचा विश्वास जनतेला मिळाला आहे. त्यामुळेच आंधळी उपसा सिंचन योजनेच्या सध्या सुरु असलेल्या कामांची कुतुहलाने पाहणी करायला रोज गर्दी होत आहे.