जामखेड -निसर्गाचा लहरीपणा अन् बाजारभावाचे बहुतेकदा चुकणारे गणित, अशा स्थितीत पारंपरिक शेतीतून पुरेसे उत्पन्न होत नव्हते. हे चित्र पालटण्यासाठी जामखेड तालुक्यातील फक्राबाद येथील योगिनाथ जायभाय या तरुण शेतकऱ्याने मोठ्या हिमतीने 10 टन रंगीत ढोबळी मिर्चीचे उत्पादन घेतले. मात्र करोनाच्या संकटाने विक्री व्यवस्था पूर्ण ठप्प झाल्याने ही मिर्ची शेतातच सडू लागली आहे.
फक्राबाद येथील शेतकरी जायभाय कुटुंबाने वर्षानुवर्षे पारंपरिक शेती केली. मात्र पुरेसे उत्पन्न हाती येत नसल्याने हरितगृहात सात महिन्यांपूर्वी अर्धा एकर क्षेत्रावर पाच हजार 900 रंगीत ढोबळी मिर्चीची रोपे लावली. मेहनत, मशागत व योग्य जलव्यवस्थापनातून जायभाय यांनी ही ढोबळी मिर्चीची बाग फुलवली. कष्टाला फळही मिळाले. पूर्ण अर्धा एकर क्षेत्र ढोबळी मिर्ची अक्षरशः बहरून गेले. या रंगीत मिर्चीला नगर, पुणे, मुंबई, दिल्ली येथील बाजारपेठांमध्ये 100 ते 120 रुपये किलो या भावाने मागणी येईल, असा अंदाज जायभाय यांना होता. मात्र करोनाचे संकट आले व त्याचा संपूर्ण बाजाराला फटका बसला.
एरव्ही त्यांना एखाद दुसरा किरकोळ ग्राहक मिळत होता. मात्र, लॉकडाऊनमुळे आता ही सोयही बंद झाली. आपत्कालीन सेवा वगळता सर्व प्रकारची विक्री व्यवस्था व दळणवळण ठप्प झाल्याने बहरलेली ढोबळी मिर्ची शिवारातच टाकून देण्याची वेळ आता या शेतकऱ्यावर येऊन ठेपली आहे.
मोठ्या आशेने हरितगृहात रंगीत ढोबळी मिर्चीचे पीक घेतले. आता हे पीक तयार झाले आहे. मात्र विक्रीच्या वेळीच करोनाचे संकट आले. त्यामुळे बाजापेठ बंद असल्याने 10 टन उत्पादनातून 5 ते 6 लाखांचे उत्पन्न हातचे गेले आहे. बाजार नसल्याने तयार झालेली मिर्ची बांधावर टाकण्याची वेळ आली आहे.
योगेश योगिनाथ जायभाय , शेतकरी, फक्राबाद