मुंबई – एकनाथ शिंदेंनी बंड केले तेव्हा ४० आमदार व १३ खासदार सोबत आले. मात्र त्यांनाच न्याय मिळत नसल्याचे चित्र आहे. आधीच भाजपने मंत्रिमंडळ विस्तार न केल्याने दहा-पाच आमदारांच्या स्वप्नांवर पाणी फेरलेे. आता सर्वेक्षणाची भीती दाखवून खासदारांची तिकिटे कापण्यासाठी व त्यांचे मतदारसंघ खेचून घेण्यासाठी भाजपकडून दबाव टाकला जात आहे. हे सर्व होत असताना शिंदे मात्र हतबल झालेले दिसतात. त्यामुळे समर्थकांत रोष वाढत आहे.
अमरावतीत आनंदराव अडसूळ व बच्चू कडूंचा विरोध झुगारून भाजपने नवनीत राणांना तिकीट दिले. दुसरीकडे श्रीकांत शिंदेंच्या कल्याणवरही भाजपने दावा केला आहे. रत्नागिरी ही शिवसेनेची जागा राणेंसाठी हिरावून घेतली. यामुळे शिवसैनिक संतप्त झालेत.
विधानसभेला हेच होण्याची आमदारांना भीती आहे. त्यामुळेच भाजपने जिथे हट्टाने बदल घडवला तिथे दगाफटका होण्याची शक्यता आहे.
अमरावतीत अडसूळ, बच्चू कडू यांनी जो उघड अजेंडा जाहीर केला त्याचा इतर मतदारसंघात शिंदेसेनेकडून छुप्या पद्धतीने अवलंब होण्याचे संकेत आहेत. त्यामुळे महायुतीचे ‘मिशन ४५’ अडचणीत येण्याची शक्यता आहे.