शिरूर -शिरूर तालुका व शहर ऑरेंज झोनमध्ये गेल्यानंतर लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणली आहे. परंतु पहिल्याचदिवशी लॉकडाऊनचे नियम, अटी पायदळी तुडविले असल्याचे चित्र दिसून आले आहे. त्यामुळे नियमांवर वचक ठेवणारी यंत्रणा बोटचेपी धोरण घेत असल्याचा सूर नागरिकांमधून आळवला जात आहे.
लॉकडाऊनचे पालन न करणाऱ्यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेशही प्रशासनाकडून देण्यात आले होते. परंतु महसूल, पोलीस प्रशासनाकडून ग्रामपंचायत, नगरपरिषद हद्दीत ठोस निर्णय घेत जात नसल्यामुळे अनेक ठिकाणी नियमांचे सर्रास उल्लंघन होत आहे.
शिरूर तालुक्यासह शहरात सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत दुकाने उघडी ठेवण्याचा निर्णय शासनाने जाहीर केला आहे. शुक्रवार सकाळपासून शिथिल झालेल्या लॉकडाऊनमध्ये वाहनचालकांनी नियमाचे उल्लंघन केले आहे. दुकानदारांनी बगल दिली आहे. हॉटेल मालकांनी तिलांजली दिली आहे.