नवी दिल्ली – कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी केंद्राने हिंसाचारग्रस्त मणिपूरमधील परिस्थिती बेफिकिरीने हाताळल्याबद्दल मोदी सरकारवर पुन्हा जोरदार टीका केली आहे. त्यांनी म्हटले आहे, की केंद्र सरकारने “संवैधानिक जबाबदारीचे इंजिन बंद केले आहे आणि चावी फेकून दिली आहे.’
मणिपूरमध्ये कायदा आणि सुव्यवस्था आणि घटनात्मक यंत्रणा पूर्णपणे मोडकळीस आल्याचे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले आहे त्याचा दाखला देत त्यांनी ही टीका केली आहे. मणिपूरचे मुख्यमंत्री बिरेन सिंग यांना घटनात्मक नैतिकतेची थोडी जरी जाण असेल तर त्यांनी ताबडतोब राजीनामा द्यावा. राजधर्माचे पालन करणारेच राजधर्माचा प्रचार करू शकतात, असे चिदंबरम यांनी म्हटले आहे.
केंद्र सरकारने घटनेच्या अनुच्छेद 355 आणि 356 मधील तरतुदींनुसार घटनात्मक जबाबदारीचे इंजिन बंद केले आहे आणि चावी फेकून दिली आहे, असे ते म्हणाले. कलम 355 बाह्य आक्रमण आणि अंतर्गत अशांतता यापासून प्रत्येक राज्याचे संरक्षण करण्याच्या कर्तव्याशी संबंधित आहे, तर कलम 356 राष्ट्रपती राजवट लागू करण्याबाबत आहे.
मणिपूरमधील स्थितीबाबत सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, राज्य पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्थेवरील नियंत्रण पूर्णपणे गमावले आहे. कोर्टाने खून, बलात्कार, जाळपोळ, घर आणि मालमत्तेची तसेच प्रार्थनास्थळांची नासधूस, स्त्रियांवरील लैंगिक अत्याचार आणि लूट या गुन्ह्यांचे तपशील राज्य सरकारकडून मागवले आहेत.