महाविकास आघाडीतील मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर महाराष्ट्रात राजकीय भूकंप झाला. महाविकास आघाडी सरकार सध्या अल्पमतात गेल्याची चर्चा सुरु आहे. त्यावर आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे यांच्यासोबत एक तास चर्चा झाल्याचा खुलासा केला आहे.
एकनाथ शिंदे यांनी पहाटेच सुरतेहून गुवाहाटीला प्रस्थान केलं. त्यावेळी शिंदे यांच्यासोबत सेनेचे ३३ आणि अपक्ष ७ असे एकूण ४० आमदार असल्याचे स्पष्ट झाले. तत्पूर्वी शिंदे यांना भेटायला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर सुरतमधील हॉटेलमध्ये आले होते. त्यावेळी त्यांच्यामध्ये सुमारे अर्धा ते पाऊण तास चर्चा झाली.
त्यानंतर आता खासदार संजय राऊत यांनी देखील शिंदे यांच्याशी सकारात्मक चर्चा झाल्याचे स्पष्ट केले. शिवसेना पाठीमागून नाही तर समोरून वार करते असे देखील राऊत यावेळी म्हणले आहेत. तसेच जास्तीत जास्त काय होईल सत्ता जाईल, सत्तेपेक्षा पक्षाची प्रतिष्ठा महत्वाची असं सूचक विधान देखील राऊत यांनी यावेळी केलं आहे.
हे आमदार आहेत शिंदे यांच्यासोबत
अनिल बाबर (खानापूर),महेश शिंदे (कोरेगाव), शहाजी पाटील (सांगोळा), लता सोनावणे (चोपडा), यामिनी जाधव (भायखळा), बालाजी किनीकर (अंबरनाथ), संदिपान भुमरे (पैठण), अब्दुल सत्तार (सिल्लोड), नितीन देशमुख (अकोला),संजय रायुलकर (मेहकर), संजय गायकवाड (बुलढाणा), एकनाथ शिंदे (कोपरी पाचपाखाडी), विश्वनाथ भोईर (कल्याण पश्चिम), ज्ञानराजे चौघुले (उमरगा), रमेश बोरणारे (विजापूर), तानाजी सावंत (परांडा), महेंद्र थोरवे (कर्जत), भरत गोगावले (महाड), महेंद्र दळवी (अलिबाग), सुहास कांदे (नांदगाव), संजय शिरसाट (औरंगाबाद पश्चिम), प्रदीप जयस्वाल (औरंगाबाद मध्य), शंभूराज देसाई (पाटण), बालाजी कल्याणकर (नांदेड उत्तर), प्रताप सरनाईक (ओवळा-माजीवाडा), प्रकाश अबिटकर (राधानगरी), चिमणराव पाटील (एरंडोल), श्रीनिवास वनगा (पालघर), नरेंद्र बोंडेकर (भंडारदरा), प्रकाश सुर्वे (मागाठणे), किशोर पाटील (जळगाव), राजकुमार पटेल (मेळघाट), शांताराम मोरे (भिवंडी ग्रामीण)
पैठण,भायखळा,भंडारदरा आणि अंबरनाथ पर्यंतचे हे सर्व आमदार आहेत. या आमदारांच्या बंडामुळे मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीला चांगलाच घाम फुटला आहे. या सर्व आमदारांची मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर नाराजी होती म्हणून त्यांनी बंडखोरी केली असल्याचं बोललं जात आहे.