देशातील महागाईचा दर पोचला तब्बल 12 टक्क्यांवर
इस्लामाबाद: पाकिस्तान मधील महागाईचा दर तब्बल 12 टक्क्यांवर पोहोचला असून एक किलो साखरेसाठी 110 रुपये मोजावे लागत आहेत. तर एक किलो गव्हाच्या पीठा साठी 96 रुपये द्यावे लागत आहेत. ऑगस्ट 2019 नंतर पाकिस्तान मधील महागाई मोठ्या प्रमाणावर वाढली असून त्याचे महत्त्वाचे कारण भारत आणि पाकिस्तान या मधील कमी झालेला व्यापार हेच आहे.
अनेक जीवनावश्यक वस्तूंची आयात पाकिस्तान भारताकडूनच करत होता पण 2019 मध्ये जेव्हा काश्मीरमधील कलम 370 मागे घेण्यात आले. तेव्हा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारतातून आयात होणाऱ्या वस्तूंवर निर्बंध लादले त्याचा मोठा फटका आता पाकिस्तानलाच बसू लागला.
पाकिस्तानला जेवढ्या औषधांची गरज भासते त्यापैकी 40 टक्के गरज फक्त भारतच पूर्ण करतो पण आता ती आयात ही बंद असल्याने दोन रुपयाच्या औषधांच्या गोळीसाठी तब्बल वीस रुपये मोजावे लागतात. ही परिस्थिती लक्षात आल्यानेच गेल्या वर्षामध्ये पाकिस्तानमधील औषध उत्पादकांनी पंतप्रधान इम्रान खान यांची भेट घेऊन भारतातून आयात होणाऱ्या औषधांवर बंदी उठवावी अशी मागणी केली होती.
भारतातून येणाऱ्या औषधांचे आयात जर थांबली तर पाकिस्तानमधील औषधांच्या किमती तब्बल 45 टक्के वाढण्याचा धोकाही त्यांनी निदर्शनास आणून अनेक महत्त्वाच्या आजारांवरील औषधे आणि लसी पाकिस्तान भारताकडून खरेदी करतो. अशी सर्व परिस्थिती असल्यानेच आगामी कालावधीमध्ये पाकिस्तानला दोन पावले मागे जाऊन भारता सोबतचे व्यापारी संबंध एकदा पूर्ववत करण्याचा विचार करावा लागणार आहे