नवी दिल्ली : भारत हा विविधतेचा देश आहे आणि येथे विविध संस्कृती, परंपरा आणि चालीरीती पाळल्या जातात. देशातील वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळ्या विवाह परंपरा पाळल्या जातात. लग्न झाल्यानंतर नवविवाहित जोडपे प्रथम आपल्या कुटुंबातील देवीची किंवा मंदिराची पूजा करतात, पण राजस्थानमधील एका गावात लग्नानंतर एक अनोखी परंपरा पाळली जाते. या परंपरेबद्दल जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल.
बडा बाग हे गाव राजस्थानमधील जैसलमेरपासू 6 किमी अंतरावर आहे. या गावात लग्नानंतर नवविवाहित जोडप्याच्या पहिल्या पूजेची अनोखी परंपरा शतकानुशतके सुरू आहे. या गावात नवविवाहित जोडपे कुलदेवी किंवा कुलदैवताच्या मंदिरात पहिली पूजा करत नाहीत. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की स्मशानभूमीत सर्वप्रथम वधू-वरांकडून पूजा केली जाते. गृहप्रवेशानंतर लगेचच नवविवाहित जोडप्याला पूजा करण्यासाठी स्मशानभूमीत नेले जाते. चला जाणून घेऊया या अनोख्या परंपरेमागील कारण काय?
बडा बाग गावातील स्मशानभूमी अतिशय खास मानली जाते. गावातील लोकांचा असा विश्वास आहे की हे राजघराण्याचे कौटुंबिक स्मशानभूमी आहे, जिथे 103 राजे-राण्यांच्या स्मरणार्थ समाधी बनवण्यात आली आहेत. स्मशानभूमीची वास्तू लोकांना आकर्षित करते.
लोकांची स्मशानभूमीवर इतकी गाढ श्रद्धा आहे की लग्नानंतर नवविवाहित जोडपेच पहिली पूजा करतात असे नाही तर प्रत्येक शुभ कार्यापूर्वी लोक येथे पूजा करण्यासाठी येतात.
* स्मशानभूमीतच पूजा का केली जाते ?
या स्मशानभूमीत नवविवाहित जोडप्याची पहिली पूजा केल्याने त्यांना दिवंगत राजे-राण्यांचा आशीर्वाद मिळतो, अशी गावातील लोकांची श्रद्धा आहे. नवविवाहित जोडपे स्मशानभूमीतील राजे आणि राण्यांच्या समाधीची पूजा करतात. लग्नानंतर पौर्णिमेच्या दिवशीही पूजा केली जाते. दिवंगत राजे-राण्यांचे आशीर्वाद घेतल्याने वैवाहिक जीवन सुखी होते, अशी श्रद्धा आहे.
* ‘असे’ आवाज स्मशानभूमीतून येतात
गावातील लोक या स्मशानभूमीत कधीही येऊ शकत नाहीत. गावातील बहुतांश लोक स्मशानभूमीत जायला घाबरतात. रात्री स्मशानभूमीच्या आसपास गावात कोणीही फिरकत नाही. स्थानिक लोक सांगतात की स्मशानभूमीभोवती घोडेस्वार आणि घोड्यांच्या खुरांचे आवाज अनेकदा ऐकू येतात. यासोबतच रात्री हुक्क्याचा आवाजही ऐकू येतो.