नगर -करोना आजार हा संसर्ग जन्य आजार आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांमध्ये संसर्ग होवू शकतो यासाठी प्रत्येकाने काळजी घेणे गरजेचे आहे. तसेच मनपा कर्मचाऱ्यांनाही आरोग्याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक असून त्यांना त्वरित मनपाने मास्कचे वाटप करण्यात यावे अशी मागणी विरोधी पक्षनेता संपत बारस्कर यांनी केली आहे.
करोना या आजाराने जगभरात थैमान घातले आहे. त्यामुळे नागरिक भयभीत झाले आहे. त्यामुळे मनपा हद्दीत व उपनगरामध्ये करोना विषाणू बाबत उपाय योजनांची तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी. शहर परिसरात औषध फवारणी करावी.
नागरिकांमध्ये या आजाराबाबत जनजागृती होणे करीता शहरातील महत्वाच्या चौकांमध्ये फ्लेग्ज बोर्ड लावण्यात यावे. नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, प्रत्येक नागरिकाने सॅनीटायझर, डेटॉल लिक्विड, साबणाने हात स्वच्छ धुवावेत.
तसेच मास्कचा वापर करावा, महानगरपालिकेच्या घंटागाड्यांच्या स्पिकरब्दारे करोना व्हायरस विषयी जनजागृती करण्यात यावी. अशी मागणी होत आहे. तसेच महानगरपालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांना कामानिमित्त शहर व उपनगरांमध्ये फिरावे लागते.
महानगरपालिकेचे दैनंदिन कामकाज करताना कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. तरी करोना या आजारापासुन नागरीकांचे संरक्षण होण्याच्या दृष्टीने तातडीने सर्व कर्मचाऱ्यांना मास्कचे वाटप तात्काळ करावे अशी मागणी मनपाचे विरोधी पक्षनेते संपत बारस्कर यांनी आयुक्तांकडे केली आहे.