पोलिसांचा प्रस्ताव : कारागृहांसाठी “ऍक्शन प्लॅन’
पुणे – करोना संसर्ग वाढू नये, यासाठी येरवडा कारागृृह प्रशासनाकडून वेगवेगळ्या उपाययोजना करण्यात येत आहेत. राज्यात सध्या 45 ठिकाणी एकूण 60 कारागृह असून, त्याची क्षमता 24 हजार कैद्यांची आहे. मात्र, सदर कारागृहात सध्या 38 हजार कैदी आहेत. त्यातील साडेआठ हजार कैद्यांना शिक्षा सुनावण्यात आली असून, उर्वरित कैद्यांची न्यायालयीन सुनावणी अद्याप सुरू आहे. त्यामुळे कारागृहावर अतिरिक्त ताण असून कारागृहातील कच्च्या कैद्यांची संख्या कमी करण्याच्या दृष्टीने छोट्या आणि मध्यम गुन्ह्यांतील कैद्यांना तात्पुरता जामीन द्यावा. त्यांना घरी पाठवून कारागृहातील गर्दी कमी करता येईल, असा प्रस्ताव न्यायालयात दिल्याची माहिती अपर पोलीस महासंचालक सुनील रामानंद यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.
रामानंद म्हणाले, “कारागृहांच्या क्षमतेपेक्षा जास्त कैदी कारागृहात असल्याने कैद्यांची गर्दी कमी करणे आवश्यक आहे. पुण्यातील येरवडा, मुंबईतील आर्थर रोड, नाशिक, ठाणे या चार कारागृहांत एकूण कैद्यांच्या 40 ते 45 टक्के कैदी बंदिस्त आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर कारागृहांतील आवाक-जावक कमी करणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने न्यायालयीन सुनावणी, जामीन यासाठी कारागृहात जाणाऱ्या बंद्यांची पुढील 15 दिवस सुनावणी हे 100 टक्के व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारेच केली जाणार आहे. प्रत्यक्ष कैद्यांना न्यायालयात हजर करण्यास याद्वारे बंदी घालण्यात येईल. कारागृहात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची गेटबाहेरच तपासणी करुन त्यानंतर त्याला कारागृहात सोडले जाईल.’
अपर पोलीस महासंचालक म्हणाले…
– बुधवारपासून राज्याच्या कारागृहांतील सर्व कैद्यांची वैद्यकीय तपासणी होणार
– ज्या संशयित कैद्यांमध्ये रोगाची लक्षणे आढळून येतील, त्यांच्यावर तातडीने पुढील औषध उपचार.
– कारागृहात विलगीकरण कक्ष स्थापला असून, चुकून संशयित कैद्यांची संख्या वाढली, तर ऍक्शन प्लॅन तयार.
– कारागृह प्रवेशद्वारावर कैद्यांना भेटण्यास येणारे कुटुंबीय, नातेवाईकांना 15 दिवस भेट रद्द.
– व्हिडिओ कॉन्फरन्स, कॉइन बॉक्सद्वारे संबंधित कैद्यांशी त्यांना संपर्क साधता येईल.
– कैद्यांची प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी आहारात आवश्यक बदल