2020 मध्ये मी अरुणाचल प्रदेशातील भारत-चीन सीमारेषेवरील जसवंतगढ या ठिकाणाला भेट दिली. इथेच रायफलमन जसवंतसिंह रावत यांना लढता लढता वीरमरण आलं. त्यांना पुढे महावीरचक्रानं गौरवण्यात आलं. त्यांच्या या महान शौर्यामुळेच नुरानांगमधील या स्थानाला जसवंतगढ असं नाव देण्यात आलं आहे. नुरानांगच्या लढाईत 17 नोव्हेंबर 1962 या निर्णायक दिवशी 4 गढवाल रायफल्समधील रायफलमन जसवंतसिंह यांच्यासह लान्स नाईक त्रिलोकसिंह नेगी आणि रायफलमन गोपालसिंह गुसैन हे तैनात होते. चिनी सैन्याचे दोन मोठे हल्ले त्यांनी परतवून लावले. मात्र तिसऱ्या हल्ल्याच्या वेळी काही चिनी सैनिक त्यांच्या अगदी जवळ आले.
चिन्यांकडे मध्यम आकाराच्या मशीनगन होत्या तर आपल्या या शूर सैनिकांकडे अवजड रायफल होत्या. तरीही या तिघांनी चिन्यांचा मुकाबला करण्याचा निश्चय केला. नेगी यांनी जसवंतसिंह आणि गुसैन यांना रायफलचं कव्हर दिलं. जसवंतसिंह आणि नेगी यांनी ग्रेनेडच्या टप्प्यात येताच चिन्यांना नेस्तनाबूत केलं याशिवाय त्यांच्या मशीनगनही ताब्यात घेतल्या! नेगी आणि गुसैन यांना तिथेच वीरमरण आलं तर जसवंतसिंह जबर जखमी झाले. जसवंतसिंह यांनी नंतर प्राण सोडले. या लढाईत 300 चिनी मारले गेले आणि भारतीय सैन्याचे तीन हुतात्मा झाले आणि आठ जखमी झाले.
जसवंतगढला अलीकडेच या शूर सैनिकांचं स्मारक उभारण्यात आलं आहे. तिथे एक वचन लिहिण्यात आलं आहे: व्हेन यू गो होम टेल देम ऑफ अस अँड से फॉर युअर टुमॉरो वुइ गेव्ह अवर टुडे (घरी गेल्यावर घरच्यांना सांगा की तुमच्या उद्यासाठी आम्ही आमच्या आजचा त्याग केला आहे.) हे वचन पाहिल्यावर लतादीदींच्या गीतातील “खुश रहना देश के प्यारों, अब हम तो सफ़र करते हैं’ हे शब्द कानात घुमल्याशिवाय राहत नाहीत.
ज्या तळघरसदृश बंकरमध्ये जसवंतसिंह आणि इतरांनी पोझिशन घेतली होती ते बंकर, त्यांनी वापरलेला ट्रान्समिटर हे सर्व तिथे पाहता येतं. आजूबाजूचा डोंगराळ आणि बर्फाळ प्रदेश, ते बंकर, कटआउट्सच्या साह्यानं दाखवलेल्या चिन्यांच्या पोझिशन्स हे पाहिल्यावर अंगावर रोमांच आणि डोळ्यांत अश्रू उभे राहतात.
आम्ही फेब्रुवारीत त्या परिसरात गेलो होतो तेव्हासुद्धा इतकी मरणाची थंडी होती की 62च्या नोव्हेंबरमध्ये काय परिस्थिती असेल याची कल्पनाच केलेली बरी. स्मारकाच्या जवळच सैन्यदलानं चालवलेलं एक कॅंटीन आहे. तिथे आम्हाला रुचकर खाद्यपदार्थ आणि गरमागरम कॉफी मिळाली. तिथे मराठी सैनिक तैनात होते. त्यांनी आमची विचारपूस केली. आम्हाला खूपच बरं वाटलं.
आजही आपलं सैन्य सीमेवर अतिशय आव्हानात्मक वातावरणात डोळ्यात तेल घालून संरक्षण करीत आहेत. ते तिथे लक्ष ठेवून आहेत म्हणूनच आपण स्वस्थपणे झोपू शकतो. वाईट असं वाटतं की आपलं नेतृत्व इतकं का बेसावध राहिलं? प्राणांची बाजी लावणाऱ्या शूर सैनिकांना योग्य ती साधनसामग्री आणि शस्त्र वेळेवर का पुरवली गेली नाहीत? आपलं नेतृत्व त्या काळी नुकतंच स्वातंत्र्य मिळाल्यानं अननुभवी असेलही कदाचित. परंतु सीमेलगत असलेल्या विस्तारवादी राष्ट्राशी इतक्या भोळ्या भावना का बाळगल्या गेल्या? अशा प्रश्नांचं मोहोळ मनात उठल्यावर अतिशय खडतर परिस्थितीत बलिदान केलेल्या जवानांप्रती आदर दुणावतो आणि मग तेथे कर माझे जुळती अशी मनाची अवस्था होते.
– श्रीनिवास शारंगपाणी