आपल्याला आयुष्यात संधी मिळणे हे कायम दुसऱ्याच्या हातात असते, पण आपण स्वतःहून स्वतःसाठी संधी निर्माण करणे हे आपल्याच हातात असते, पण कसे? याच विषयी थोडेसे…
आपण प्रत्येकजण आपल्या आयुष्यात काहीतरी करून दाखविण्यासाठी प्रयत्न करीत असतो. आपण ठरविलेले साध्य करण्यासाठी अपार कष्ट घेतच असतो. अशा प्रयत्नांतून बऱ्याच वेळा आपल्याला यश येते, तर बऱ्याच वेळा अपयशही येते. या सर्व प्रयत्नांत बरेच काही आपल्या हातात असते तर बरेच काही आपल्या हातात नसतेही. चित्रपट अभिनेते अमिताभ बच्चन हे त्यांच्या भारदस्त आवाजासाठी ओळखले जातात. ऑल इंडिया रेडिओसाठी त्यांनी एकदा इंग्रजी व एकदा हिंदी वृत्त वाचनासाठी प्रयत्न केला, पण दोनदा नकारच मिळाला. येथे प्रयत्न करणे अमिताभ यांच्या हाती होते तो त्यांनी केला. बाकी पुढे त्यांना नाकारायचे की स्वीकारायचे ऑल इंडिया रेडिओमधील पदाधिकारीच ठरविणार होते.
आपणही हाती घेतलेल्या आपल्या कामात आपले 100 टक्के द्यावयाचे आहे. जे आपल्या हातात नाही, त्याबाबत जास्त विचार न करता आपल्या प्रयत्नांवर विश्वास ठेवायचा आहे. आपल्याला जेव्हा अपयश येईल त्यावेळी त्या प्रत्येक अपयशातून आपल्याला काही नवीन शिकायला मिळेल. ऑल इंडिया रेडिओसाठी जेव्हा अमिताभ आवाजाची चाचणी द्यायला गेले तेव्हा त्यावेळी त्यांचा आवाज जरी दमदार असला तरी आवाजातील चढ-उतार, कोणत्या शब्दावर जोर द्यावा याबाबत त्यांना एवढी जाणीवही नसेल. अभिनय करायला लागल्यानंतर दिग्दर्शकाने त्यांना कसे संवाद बोलावयाचे हे शिकविले असेल. आपणही आपल्यात सतत सुधारणा करतच राहिले पाहिजे. आपण आपल्याला सिद्ध करून दाखविले पाहिजे.
बऱ्याच व्यक्तींच्या बाबतीत असेही होते की त्यांच्यात गुणवत्ता खूप असते; पण त्यांना संधीच मिळत नाही. खेळामध्ये मिलींद गुंजाळ, सुरेंद्र भावे, अमोल मुजुमदार असे कितीतरी गुणवान क्रिकेट खेळाडू आहेत. पण या सर्व खेळाडूंना कोणत्याही प्रकारचा एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळता आला नाही. गुणवत्ता जरी असली तरी कधी असेही होऊ शकते की संधीच मिळत नाही. आपल्याही बाबतीत असे होऊ शकते. वास्तविक वर नमूद केलेल्या खेळाडूंना जरी मोठी संधी मिळाली नसली तरी त्यांना त्यांच्या क्षेत्रात जेवढे काही करता आले तिथपर्यंतही बऱ्याच जणांना पोहोचता आलेले नाही. म्हणजेच त्यांनी जेथपर्यंत मजल गाठलेली आहे तीही एक उपलब्धी आहे. आपण आपल्या क्षेत्रात जरी सर्वोच्च पातळीला जरी पोहोचलो नाही तरी चालेल. एक सरासरी पातळीवर जरी आलो तरी पुरेसे असते.
आपण आपल्यातील गुण कौशल्ये ओळखून आपले क्षेत्र निवडायचे. कोणी अभ्यासात हुशार नसेल याचा अर्थ असा नाही की तो/ती कोणत्याच क्षेत्रात हुशार नाही. अभ्यास ढ असणारी व्यक्ती उत्कृष्ट चित्रकार असू शकते. उत्कृष्ट गायक असू शकते. उत्कृष्ट पाककृती बनवू शकते. वाहन चांगल्याप्रकारे दुरुस्त करू शकते. उत्कृष्ट खेळाडू असू शकते. अशी कितीतरी क्षेत्रे आहेत. आपण फक्त आपल्यालाच ओळखायला हवे. माणसाच्या बुद्धीचे अनेक पैलू आहेत. एखाद्या व्यक्तीचे जरी कोणत्या एका क्षेत्रात काही डोकेच चालत नसेल तरी दुसऱ्या क्षेत्रात ती व्यक्ती खूपच चांगली कामगिरी करू शकते. गरज आहे ती फक्त आपण स्वतःला ओळखण्याची. आपण स्वतःवर विश्वास ठेवायला हवा. आपण कोणते काम चांगले करू शकतो याचा अचूक विचार करायला हवा व त्याक्षेत्रात जायला हवे.
काही व्यक्तींकडे उत्तम संघटन कौशल्य असते. उत्तम संवाद कौशल्य असते. अशा काही कौशल्यांचा उपयोग करून ते खूप काही करू शकतात. अशा व्यक्ती उत्पादन विक्री चांगल्या प्रकारे करू शकतात. एखाद्या मंडळाचे जास्तीत जास्त सभासद बनवायचे असतील, तर अशा व्यक्ती खूप सभासद बनवून आणतील. पण याच व्यक्ती मंडळाची ध्येय धोरणे ठरविणे, निर्णय घेणे याबाबतीत कमी पडतील. अशा स्वतःच्या मर्यादा लक्षात घेऊन जे काम उत्तम प्रकारे जमू शकते तेच करावे. तसेच आपल्यातील गुणांचा व्यावहारिक व व्यावसायिकदृष्ट्या कसा चांगला उपयोग करून घेता येईल याकडे लक्ष द्यावे.
अशी क्षेत्रे जेथे आपल्याला कोणीतरी संधी देणे आवश्यक असते, जसे खेळाडूची निवड संघामध्ये करणे, नोकरीसाठी उमेदवार निवडणे वगैरे बाबतीत आपण आपली गुणवत्ता वाढवू शकतो, पण आपल्या मर्यादा असल्याने जर आपल्यापेक्षा दुसरा चांगली कामगिरी करीत असेल, किंवा नोकरीसाठी जास्त योग्य असेल तर त्याला/तिला संधी मिळते. अशा क्षेत्रांत आपल्याला प्रयत्न करूनही जर संधी मिळाली नाही, तर आपण इतर क्षेत्राकडे वळू शकतो. आपण संधी मिळण्यासाठी किती प्रतिक्षा करावी याचा निर्णय आपणच घ्यावयाचा असतो. एका ठराविक टप्प्यावर आपण इतर क्षेत्राकडे वळलेच पाहिजे. जसे आपण आपला स्वतंत्र व्यवसाय सुरू करू शकतो. व्यवसायात आपण स्वतःच्या बुद्धिमत्तेवर, कौशल्यावर प्रगती करू शकतो. व्यवसायात कोणी आपल्याला संधी देईल याची वाट पाहण्याची आवश्यकता नसते. तसेच आपण आपल्या अंगीभूत कला गुणांचा वापर करून आपण आपले स्थान निर्माण करू शकतो.
विहाय पौरुषं यो हि दैवमेवावलम्बते।
प्रासादसिंहवत् तस्य मूर्ध्नि तिष्ठन्ति वायसाः।।
(स्थूलार्थ : पराक्रम करायचे सोडून जो केवळ दैवावर अवलंबून राहतो त्याच्या डोक्यावर राजवाड्यातल्या सिंहाच्या पुतळ्यावर बसतात त्याप्रमाणे कावळेच बसतात. कारण तो माणूस आपल्याला काही अपाय करणार नाही अशी जणू कावळ्यांनाही खात्री असते.)
एक मात्र खरे की आपण कोणत्यातरी क्षेत्रात सरासरी पातळीवर पोहोचलेच पाहिजे. आपली जर काहीच करण्याची इच्छा नसेल तर नशिबालाही दोष देण्यात काहीच अर्थ नाही की इतर यशस्वी व्यक्तीबाबत चांगले-वाईट काहीच बोलण्याचा अधिकार नाही. वर दिलेल्या सुभाषिताप्रमाणे बरीच माणसे अशी असतात की “असे माझा हरी तर देईल खाटल्यावरी’ या विचाराने काहीच करीत नाही.
पण त्यांना यशस्वी माणसाला जे मिळाले तर सर्व हवे असते, जे कधीच शक्य नाही. त्यांच्या नशिबाने त्यांना जरी मिळाले तरी ते मिळालेले यश, सोयी-सुविधा, धन-संपत्ती वगैरे टिकवून ठेवण्याची अक्कल नसते. त्यामुळे त्यांच्या हातात काहीच टिकून राहात नाही. पिंपळाचे, वडाचे झाड जसे अगदी दगडावरही उगवते, तसे आपण प्रतिकूल परिस्थितीतही संधी शोधायला हवी, निर्माण करायला हवी. आपण आपल्या मनमंदिराच्या गाभाऱ्यात बसून आपल्या मनोदेवतेला “आपणच स्वतःसाठी कशी संधी निर्माण करू शकतो?’ हे विचारावे. जे उत्तर मिळेल ते आपल्याला आयुष्यात यशस्वी बनविणार आहे हे निश्चित.
– अनिकेत भालेराव