नवी दिल्ली :- भारतीय संघ व्यवस्थापन आणि बीसीसीआयने विश्वचषकासाठी संघात महत्त्वपूर्ण बदल केला आहे. दुखापतग्रस्त अक्षर पटेलच्या जागी रविचंद्रन अश्विनचा 15 सदस्यीय संघात समावेश करण्यात आला आहे. आशिया चषकादरम्यान अक्षरला दुखापत झाली होती. अलीकडेच अश्विनला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत खेळण्याची संधी मिळाली होती.आयसीसीने X (Tweeter) पोस्टद्वारे या बदलाची पुष्टी केली आहे.
अश्विन शनिवारी भारतीय संघासोबत गुवाहाटी येथे इंग्लंडविरुद्धच्या विश्वचषक सराव सामन्यापूर्वी सरावासाठी पोहोचला होता आणि अक्षर तिथे दिसला नाही. त्यानंतर अक्षर तंदुरुस्त नसल्याचे जाणवले आणि अश्विनचा विश्वचषक योजनेत समावेश करण्यात आला.
रविचंद्रन अश्विन आता तिसरा एकदिवसीय विश्वचषक खेळणार आहे. गुरुवार ही संघात बदल करण्याची शेवटची तारीख होती आणि संघ व्यवस्थापन आणि बीसीसीआयने अखेरच्या क्षणी हा निर्णय घेतला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत अश्विनने दोन सामन्यांत चार विकेट घेतल्या होत्या. याच कामगिरीच्या जोरावर त्याने निवडकर्त्यांना खूप प्रभावित केले.इंदूरच्या सपाट खेळपट्टीवर अश्विनच्या घातक गोलंदाजीमुळे टीम इंडियाचा विजय झाला. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या इंदूर वनडेमध्ये अश्विनने 41 धावांत तीन विकेट घेतल्या होत्या.
अश्विनने Team India साठी 115 वनडे खेळले आहेत. या 115 सामन्यांमध्ये आर. अश्विनने 4.95 च्या इकॉनॉमी आणि 33.2 च्या सरासरीने 155 विकेट घेतल्या आहेत. 25 धावांत चार विकेट ही आर. अश्विनची वनडेतील सर्वोत्कृष्ट कामगिरी आहे. त्याशिवाय गरज पडल्यास अश्विन फलंदाजीतही योगदान देऊ शकतो. अश्विनने वनडेमध्ये 86.96 च्या स्ट्राइक रेटने आणि 16.44 च्या सरासरीने 707 धावा केल्या आहेत.
विश्वचषकासाठी भारतीय संघ :-
फलंदाज: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव.
यष्टिरक्षक: केएल राहुल, इशान किशन.
अष्टपैलू: हार्दिक पांड्या (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर.
गोलंदाज: जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, रविचंद्रन अश्विन.