जयपूर – नावात काय आहे, हा प्रश्न नेहमी चर्चेत असतो पण, राजस्थानातील अनेक जातींमध्ये
आजही दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या मुलींची नावे नकोशी अशा अर्थाची असतात. उदाहरणच
द्यायचे झाले तर अनेक मुलींची नावे `धापू अशी असतात. `धापू’ याचा अर्थ `आम्ही पालक
आता वैतागलेलो आहोत’. `रामघनी’ हे एक असेच नाव आहे. याचा अर्थ हे `रामा आता तू
आम्हांला खूप मुली दिलेल्या आहेस’. `हायचुकी’ (आता बास!), `अंतिमा’ (शेवटची) अशी अनेक
मुलींची नावे असतात.
यापुढे जाऊन अनेक मुलींची नावे मिस्ड कॉल, नाराजी, फालतू, गॅरंटी अशी असल्याचे दिसून
येते. या मुलींनी जन्म घेणे पालकांना नको होते आणि त्या नको असताना जन्माला आल्याचे
सूचित करणाऱ्या नावाने त्या मुलींना हाक मारली जाते.
सवाई माधवपूर जिल्ह्यातील लखनपूर या गावातील 15 वर्षांची हायचुकी शर्मा म्हणते, “माझ्या पालकांसाठी मी ओझे आहे याची मला कल्पना आहे. माझ्या नावातून त्याची मला सतत जाणीव करून दिली जात असते. मी मोठी झाल्यावर माझे नाव बदलून चांगला अर्थ असणारे नाव ठेवणार आहे.’’ ती तिच्या आईवडिलांच्या पोटी जन्मलेली चौथी कन्या आहे.
तिच्यापेक्षा मोठी असणाऱ्या तिसऱ्या क्रमांकाच्या कन्येचे नाव धापू असे आहे. पुत्राची अपेक्षा असताना कन्यारत्न झाले म्हणून नाराज असणारे पालक चिडून मुलींची नावे अशी अडनिडी आणि अपमानास्पद वाटावे अशी ठेवतात. मन्चिता नावाची मुलगी म्हणते, धाकट्या बहिणीचा जन्म झाल्यावर मी आईला म्हणाले की, आता तिचे नाव तरी कमीतकमी चांगले ठेव. पण तसे झाले नाही. कारण आजीनेच तिचे नाव ठेवले आणि तिच्यापुढे कुणी काही विचारू शकत नाही.
घराण्याचे नाव टिकून रहावे, वंशाला दिवा मिळावा, संपत्तीला वारस मिळावा म्हणून आजही
समाजात प्रत्येकाला मुलगा हवा असतो. त्यामुळे मुलगा जन्मला की कुटुंबात आऩंदाचे
वातावरण असते आणि मुलगी जन्मली की नाराजी आणि तणावपूर्ण वातावरण निर्माण होते.
त्याचे प्रतिबिंब मुलींच्या नावात उमटते.
टोंक जिल्ह्यातील देवरी गावातील भारत मीणा यांना तीन मुलींच्या पाठीवर मुलगा झाला. दुसऱ्या आणि तिसऱ्या मुलीच्या वेळीच त्यांना मुलगा होण्याची अपेक्षा होती. मात्र तसे न घडल्याने त्यांनी या मुलींची नावे अंतिमा आणि मिस्ड कॉल अशी ठेवली. ते म्हणतात, “मला दुसरी मुलगी झाल्यावर आता ही अंतिम असेल असे म्हणून मी तिचे नाव अंतिमा ठेवले. तिसऱ्यांदा पुन्हा मुलगीच झाली. ती अपेक्षित नसल्याने मी तिचे नाव मिस्ड कॉल ठेवले.’’
अनेक कुटुंबांना दोन मुलगे हवे असतात. एकाच्या बाबतीत काही दुर्दैवी घटना घडली तर
वंशाला दिवा म्हणून दुसरा मुलगा असावा अशी इच्छा असते. लासादिया गावातील संपत
मीणा यांना पहिलाच मुलगा झाला. मात्र आणखी एक मुलगा असावा म्हणून ते प्रयत्न करत
राहिले आणि चार मुली झाल्या. तिसऱ्या मुलीचे नाव त्यांनी देवावरील नाराजी म्हणून
`नाराजी’ ठेवले.
पाचव्या वेळी पत्नी गरोदर राहिली तेव्हा ते म्हणत, “माझे अंतर्मन मला सांगते आहे की, यावेळी देखील मुलगीच होणार. मी गॅरंटीने सांगतो, मुलगीच होणार.’’ त्यांचा हा विश्वास खरा ठरला आणि मग नाराज होऊन त्यांनी मुलीचे नाव गॅरंटी ठेवले. राजस्थानात मुलगे आणि मुलींमधील भेद हा इतका टोकाला गेला आहे की, त्याबद्दल आता मुलींनाही काही वाटत नाही. केवळ वंशाचा दिवा नव्हे तर मुलींच्या लग्नासाठीचा खर्च हा देखील यामागील मुद्दा आहे. 25 वर्षांच्या रामघनी मीणा या तीन आई आहेत.
त्या म्हणतात, मुलीच्या लग्नासाठी आधी किमान तीन लाख रुपये हुंडा द्यावा लागतो. पुन्हा लग्नासाठी पाच ते सहा लाख रुपये खर्च करावे लागतात. मुलगा जर सरकारी नोकरीत असेल तर तीस लाखांपर्यंत हुंडा मागितला जातो.