भोपाळ – कुन्नूर हेलिकॉप्टर अपघातातून बचावलेले ग्रुप कॅप्टन वरुण सिंग यांचे निधन झाले आहे. बंगळुरुतील रुग्णालयात आठवड्याभराच्या उपचारांनंतर त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्यावर 17 डिसेंबर रोजी लष्करी इतमामात भोपाळमधील बैरागढ येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. गुरुवारी दुपारी अडीच वाजता त्यांचे पार्थिव भोपाळला पोहोचले. येथे त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान म्हणाले, भारतमातेचे खरे सुपुत्र, शौर्याचे प्रतिक असलेले शूर योद्धा वरुण सिंहजी यांच्या चरणी मी विनम्र अभिवादन करतो. वरूण सिंह एक अद्भुत आणि अद्वितीय योद्धा होते. त्यांनी यापूर्वीही अनेकदा मृत्यूला हरवले होते. आता ते आपल्यात नाहीत. त्यांच्या पार्थिवावर पूर्ण शासकीय आणि लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. प्रत्येक भारतीय त्यांच्या कुटुंबाच्या पाठीशी उभा आहे. आमच्या शूर योद्ध्याला केवळ आदराने निरोप दिला जाणार नाही, तर त्यांची स्मृती कायम ठेवण्यासाठी आम्ही एका संस्थेला त्यांचे नाव देणार आहोत तसेच त्यांचा पुतळा बाधण्यासाठी कुटुंबाशी चर्चा करू. त्यांच्या भावना लक्षात घेऊन आम्ही पावले उचलू. अमर शहीद यांच्या कुटुंबीयांना एक कोटी रुपयांचा सन्मान निधीही दिला जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री चौहान यांनी दिली.
दरम्यान, ग्रुप कॅप्टन वरुण सिंह यांचे पार्थिव लष्कराच्या विशेष विमानाने दुपारी 2.30 वाजता भोपाळला पोहोचले. नातेवाईकांना दर्शनासाठी कॅप्टन वरुण यांचे वडील निवृत्त कर्नल केपी सिंग राहतात त्या एअरपोर्ट रोडवरील इनर कोर्ट कॉलनीत अंतिम दर्शनासाठी वरूण यांचे पार्थिव ठेवण्यात येईल. त्यानंतर पार्थिव इंद्रप्रस्थ पार्कमध्ये नेण्यात येईल. तिथे लष्कराच्या प्रोटोकॉलनुसार अंतिम दर्शनासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. रात्री कॅप्टन वरुण यांचे पार्थिव 3 ईएमई सेंटर येथील मिलिटरी हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात येणार आहे. त्यांच्या पार्थिवावर 17 डिसेंबर रोजी सकाळी 11 ते 12 या वेळेत बैरागढ विश्राम घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.